– माधव विद्वांस
तिरंगा ध्वज हा सर्व भारतीयांना प्रिय व वंदनीय आहेच; पण याचा निर्माता कोण याची माहिती असणेही खूप जरुरी आहे. तिरंगा ध्वजाची कल्पना, त्याचे संकल्पचित्र व निर्मिती करणारे पिंगली व्यंकय्या यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम जवळील भातलापेनुमारू येथे 2 ऑगस्ट 1876 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हनुमंत्रयडू आणि आईचे नाव वेंकटरत्नम्मा. चेन्नई येथून हायस्कूल उत्तीर्ण केल्यानंतर, ते पुढचे शिक्षण घेण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. परत आल्यावर अँग्लो-वेदिक महाविद्यालयात उर्दू आणि जपानी भाषा शिकण्यासाठी लाहोरला गेले. त्यांनी काही काळ लखनौमध्ये रेल्वे गार्ड म्हणूनही काम केले.
त्यांना अनेक विषयांची जाण होती. त्यांना भूगर्भशास्त्र आणि कृषी या विषयांची विशेष ओढ होती. ते हिऱ्यांच्या खाणकामातही निष्णात होते. त्यामुळे त्यांना “डायमंड व्यंकय्या’ असे टोपणनावही देण्यात आले. तसेच त्यांना “पत्ती व्यंकय्या’ (कापूस व्यंकय्या) असेही संबोधले जात असे. त्यांनी एकदा आंध्र प्रदेशातील बापटला येथील शाळेत जपानी भाषेत पूर्ण लांबीचे भाषण केले. तेव्हापासून त्यांना “जपान व्यंकय्या’ असेही म्हणत. वर्ष 1906 ते 1911 या कालावधीमध्ये त्यांनी प्रामुख्याने कापूस पिकाच्या विविध जातींच्या तुलनात्मक अभ्यास केला होता. त्यांनी बोमव्होलार्ट कंबोडियन कापसावरील त्यांचा लेख प्रकाशित केला होता.
वर्ष 1911 ते 1944 या कालावधीमध्ये त्यांनी मछलीपट्टणम येथील आंध्र नॅशनल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. त्यांनी नेल्लोरमध्ये अभ्रकावर संशोधन केले. त्यांनी भूगर्भशास्त्रावर “थल्ली रायी’ नावाचे पुस्तकही लिहिले. व्यंकय्या यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यातही काम केले आणि दक्षिण आफ्रिकेतील अँग्लो-बोअर युद्धात भाग घेतला. युद्धादरम्यान जेव्हा सैनिकांना ब्रिटनचा राष्ट्रध्वज असलेल्या युनियन जॅकला सलामी द्यावी लागली तेव्हा व्यंकय्या यांना भारतीयांसाठी ध्वज असण्याची गरज जाणवली.
आफ्रिकेत ते महात्मा गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारसरणीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. त्यांनी ध्वजासाठी 30 संभाव्य संकल्पचित्रांसह भारत देशाची ध्वजपताका (भरता देशनिकी जातिया पतकम) नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी मछलीपट्टणम येथील आंध्र नॅशनल कॉलेजमध्ये काम करताना कॉंग्रेस नेतृत्वाला विविध कल्पना मांडल्या.
1 एप्रिल 1921 रोजी विजयवाडा येथे भरलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून व्यंकय्या यांनी ध्वजासाठी संकल्पचित्र सादर केले होते. त्यांनी खादीच्या कापडावर ध्वजाची प्राथमिक रचना केली. हा पहिला ध्वज लाल व हिरवा रंगाचा होता. गांधींच्या सूचनेनुसार, व्यंकय्या यांनी एक पांढरा पट्टा जोडला.
पण कॉंग्रेसने ध्वज अधिकृतपणे स्वीकारला नाही. मात्र, 1921 पासून व्यंकय्या यांचा ध्वज कॉंग्रेसच्या सर्व सभांमध्ये अनौपचारिकपणे वापरला जाऊ लागला. वर्ष 1931 मध्ये लाल रंग नारंगी केला. भारताच्या स्वातंत्र्याच्या 20 दिवस आधी 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या बैठकीत हा ध्वज सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. 4 जुलै 1963 रोजी त्यांचे निधन झाले.