– माधव विद्वांस
संगीत रंगभूमीवर “गंधर्वयुग’ पुन्हा निर्माण करणारे बालगंधर्व ऊर्फ नारायण श्रीपाद राजहंस, यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 26 जून, 1888 रोजी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात नागठाणे या गावी झाला. लहानपणापासूनच नारायणरावांना संगीताची आवड होती.
भजन, गायन करीतच त्यांनी आपली गायनसेवा सुरू केली. वर्ष 1906 ते 1955 या पन्नास वर्षांच्या कालखंडात स्त्रीभूमिका आणि नंतर पुरुष भूमिकाही करून सुमारे 25 नाटकांत काम करून बालगंधर्वांनी रसिकांना संतुष्ट केले व मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि संपन्न केली. त्यावेळी स्त्रीभूमिका पुरुषांनाच पार पाडावी लागे.
बालगंधर्व यांचा चेहरा नाजूक, सुंदर व आवाजही कोमल होता. स्त्रीसुलभ भावमुद्रा त्यांनी इतक्या आत्मसात केल्या होत्या की, बघणाऱ्यांना ती मूर्तिमंत स्त्रीच आहे असे वाटत असे. असे म्हणतात की, ते एकदा बायकांच्या हळदी-कुंकू समारंभातही वेष बदलून जाऊन आले होते.
त्यांचे शिक्षण इंग्रजी दुसऱ्या इयत्तेपर्यंतच झाले. कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी त्यांचे गुण ओळखले होते. त्यांना कर्ण दोष झाल्याने मिरज हॉस्पिटलमध्ये ऐकण्याच्या समस्यांवर उपचार घेण्यासाठी शाहू महाराजांनी मदत केली. गोविंद बल्लाळ देवल आणि कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर या श्रेष्ठ नाटककारांकडून तसेच गोविंदराव टेंबे व गणपतराव बोडस या
नटश्रेष्ठांकडूनही बालगंधर्वांना अभिनयाचे शिक्षण मिळाले. तसेच त्यांना गायनाचे परिपूर्ण शिक्षण सुप्रसिद्ध गायक भास्करबुवा बखले यांच्याकडून मिळाले होते. लोकमान्य टिळकांनी त्यांचे गाणे प्रथमच ऐकले त्यावेळी, “हा तर बालगंधर्व आहे’ असे सहजस्फूर्त उद्गार त्यांनी काढले व तेव्हापासूनच नारायणराव “बालगंधर्व’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या “शाकुंतल’ आणि “सौभद्र’ या नाटकांतील शकुंतला आणि सुभद्रा, गोविंद बल्लाळ देवल यांच्या “मृच्छकटिक’मधील वसंतसेना, “शारदा’मधील शरदा आणि “संशयकल्लोळ’मधील रेवती, या त्यांच्या भूमिकांनी रसिकांची मने जिंकली. “शाकुंतल’ नाटकातील “मना तळमळसी’, “सौभद्र’ नाटकातील “किती सांगू तुला’,
“पुष्पकराग सुगंधित’ आणि “पांडू नृपति’, मानापमान नाटकातील “खरा तो प्रेमा’, “विद्याहरण’ नाटकातील “आता राग देई मना’ आणि “मधुकर वन वन’, स्वयंवर नाटकातील “स्वकुल तारक’, “मम सुखाची ठेव’, “नरवर कृष्णासमान’व “करिन यदुमनी’ आणि “एकच प्याला’ नाटकातील, “मानस का बधिरावे’ व “सत्य वदे वचनाला’, अशी त्यांची अनेक नाट्यगीते लोकप्रिय होती.
ख्याल, ठुमरी, गझल, दादरा आणि भक्तिगीते हे सर्व प्रकार ते सारख्याच कौशल्याने गात असत. त्याचा आनंद घेण्यासाठी अल्लादियाखॉं साहेबांसारखे गानमहर्षीही नेहमी उत्सुक असत. “स्वयंवर’ नाटकातील “स्वकुल तारक सुता’ या पदातील स्वरविलास ऐकून अल्लादियाखॉं यांनी उठून दाद दिली आणि आपल्याही असा षड्ज लावता येणार नाही, असे जाहीरपणे कबूल केले.
रंगभूमीवर भूमिका करत असताना त्यांनी विपुल संपत्ती मिळविली आणि रंगभूमीला समृद्ध करण्यासाठीच ती सर्व खर्च केली. कोणत्याही व्यवसायात आवश्यक असणारा व्यवहारीपणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले, त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. त्यांच्या डोक्यावर वर्ष 1921 मध्ये दीडलाख रुपयांचे कर्ज झाले. ते सव्याज फेडण्यासाठी 1927 पर्यंत त्यांनी सावकारांना पावणेतीन लाख रुपये द्यावे लागले.
4 जून 1955 रोजी त्यांनी केलेली “एकच प्याला’ नाटकातील “सिंधू’ची भूमिका ही त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील शेवटची भूमिका. त्यानंतर ते नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. 15 जुलै, 1967 रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.