सातारा – आपल्या मुलांना दुचाकी चालवायला देवू नका, असे आवाहन पोलीस दल, आरटीओकडून करण्यात येते. मात्र, पालक ऐकत नाहीत. मग दुर्देवी प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशीच अपघाताची दुर्देवी घटना सोमवारी रात्री जंरडेश्वर नाका परिसरात घडली.
भरधाव वेगाने दुचाकी घेवून निघालेल्या मुलाने एका रिक्षाला धडक देऊन पुन्हा समोरुन येणाऱया कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी होवून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. नितीन विनोद डवरी (वय 15, रा. खेड, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रिक्षाचालक दिलीप निळकंठ देवरे (रा. चिमणपुरा पेठ, सातारा) हे त्यांच्या रिक्षात गॅस भरल्यानंतर वाडे फाट्याकडून सातारा शहराकडे येत होते. ते जरंडेश्वर नाका परिसरात मारुती मंदिरासमोरुन जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या हिरो होंडा कंपनीच्या दुचाकीवरील युवकाने त्यांच्या मटगार्डला जोराची धडक दिली.
त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून दुचाकीस्वाराने समोरुन येणाऱया इरटिका कार (एमएच 12. क्यूवाय 5600) या कारच्या उजव्या बाजुला धडक देऊन तो रस्त्यावर दुचाकीसह जोरात पडला. तो गंभीर जखमी झाला. अपघातामुळे तीन वाहने रस्त्यावर थांबल्याने यावेळी परिसरातील वाहतूक थांबली.
त्याला रिक्षाचालक देवरे व कार चालक युवराज हणमंत माने (वय 31 रा. शहापूर, ता. सातारा) यांनी लोकांच्या मदतीने रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, तो दुचाकीस्वार युवक नितीन विनोद डवरी असल्याचे समोर आले. तो खेड येथील रहिवासी असून दुचाकीवरुन भरधाव वेगाने जात वाहनांना धडक देवून अपघातात गंभीर जखमी होवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली.
अपघातस्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार कुमठेकर आहेत.