स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्यांना घरी जाण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात, करोनाची लक्षण ज्यांच्यात आढळली नाहीत; त्यांनाच प्रवासाची मुभा मिळणार आहे.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. अडकलेल्या लोकांना स्वगृही पाठवण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात, अशी मागणी विविध राज्यांकडूनही केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यामुळे काही अटींचे पालन करून अडकलेल्या लोकांची घरवापसी शक्य होणार आहे.
अडकलेल्यांची परतपाठवणी रस्तामार्गे होणार आहे. त्यासाठी बसगाड्यांचा वापर करावा लागणार आहे. संबंधित बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. तसेच, प्रवासावेळी सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करावे लागेल. अडकलेल्या लोकांना पाठवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया निश्चित करावी लागेल. त्यावरील देखरेखीसाठी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्या अधिकाऱ्यांना अडकलेल्या लोकांची नोंदणी करावी लागेल. परतपाठवणी आणि घरवापसीशी संबंधित राज्यांनी एकमेकांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे.