श्रीनगर – पाकिस्तानी क्रिकेट संघाचा विजय साजरा केल्याबद्दल काही काश्मिरी विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्याविषयी नाराजी व्यक्त करणारे पत्र जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली आहे.
टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाविरोधात झालेल्या सामन्यात पाकिस्तानी संघाने विजय मिळवला. तो विजय भारतात काही ठिकाणी साजरा करण्यात आल्याच्या घटना घडल्या.
तशाप्रकारच्या घटनेवरून श्रीनगरमध्ये वसतिगृहांत राहणाऱ्या काही वैद्यकीय विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कठोर मानल्या जाणाऱ्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) तरतुदींतर्गत ती कारवाई करण्यात आली. त्याशिवाय, आग्य्रात शिकणाऱ्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली.
त्याचा संदर्भ घेऊन मेहबुबा यांनी मोदींना पत्र पाठवले आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे काश्मीरमधील तरूणाई आणि देशातील नागरिकांदरम्यान अविश्वासाची, दुराव्याची भावना वाढीस लागेल. आपुलकीतूनच देशभक्ती आणि निष्ठेची भावना रूजवायला हवी. लाठी किंवा बंदुकीचा वापर करून ते घडणार नाही, अशी भूमिका मेहबुबांनी मांडली आहे.