धारवाड – धर्मांतर थाबायला हवे आणि ज्यांनी धर्मांतर केले आहे, त्यांनी त्याबाबतची माहिती द्यायला हवी, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. जर धर्मांतर विरोधी कायदा झाला तर त्याचे स्वागतच केले जाईल, असेही संघाने म्हटले आहे.
लोक धर्मांतर करतात. मात्र त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे ते दुहेरी लाभ घेत असतात, असे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
धर्मातर विरोधी कायद्याला अल्पसंख्यांकांकडून का विरोध होतो आहे, हे उघड आहे. फसवणूक करून अथवा अन्य कोणत्याही मार्गांनी धार्मिक आकडेवारी वाढवण्याचे प्रयत्न मान्य असू शकत नाहीत. केवळ संघानेच नव्हे तर महात्मा गांधींनीही धर्मांतराला विरोधच केला आहे. देशातील 10 पेक्षा अधिक राज्यांमध्ये धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशात वीरभद्र सिंह हे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असताना धर्मांतर बंदी विधेयक मंजूर केले गेले आहे. अरुणाचल प्रदेशमध्येही कॉंग्रेस सरकारच्याच काळातच धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला होता. धर्मांतर करण्याचे स्वातंत्र्य पूर्वीपासूनच होते. मात्र आज जे होत आहे, ते स्वातंत्र्य नाही.
धर्मांतर बंदी कायद्याबाबत देशव्यापी चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनीही व्यक्त केली होती, असेही होसबाळे म्हणाले.