नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताने सर्व देशांना मदत करावीच पण ते करताना सरकारने प्रथम देशवासियांची गरज पहिली भागवली पाहिजे अशी सूचना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ट्रम्प यांनी औषध पुरवठ्याच्या बाबतीत भारताला धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या ट्विटर प्रतिक्रियेत त्यांनी ही बाब नोंदवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मैत्रीत धमकी दिली जात नाही, भारताने सर्वच देशांने मदत केली पाहिजे, पण या अडचणीच्या काळात भारतातील नागरिकांची गरज भागवणे आवश्यक आहे त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
या संबंधात कॉंग्रेसचे प्रवक्ते शक्तिसिंह गोहील यांनी म्हटले आहे की, आम्हाला औषध पुरवठा केला नाही तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल ही ट्रम्प यांनी दिलेली धमकी ही संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पूर्ण महिना वाया घालवला आणि त्यासाठी शंभर कोटी रूपये खर्च केले. पण ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लगेच शरणागती पत्करून औषध निर्यातीवरील बंदी मागे घेतली अशी टीकाही त्यांनी केली आहे.