पुणे – राज्यातील व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परीक्षेचा (सीईटी) रखडलेला निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. एमबीए सीईटीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या 38 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
राज्य सीईटी सेलकडून 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान सहा सत्रांमध्ये एमबीएची सीईटी घेण्यात आली होती. मात्र, या परीक्षेबाबत आक्षेप नोंदवत 38 उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे परीक्षा होऊन महिना उलटून गेल्यानंतरही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच, निकाल जाहीर होत नसल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबरला दिलेल्या निर्णयानुसार याचिका दाखल केलेल्या 38 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवून उर्वरित उमेदवारांचा निकाल जाहीर केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.