इंफाळ – मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात मृतांची संख्या वाढून 54 झाली आहे, जखमींची संख्याही दीडशेच्यावर गेली आहे. राज्यातील विस्थापित नागरीकांची संख्याही हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान येथील स्थिती आता नियंत्रणात असल्याचा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. दुकाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि रस्त्यावर गाड्या धावू लागल्याने शनिवारी इंफाळ खोऱ्यातील स्थिती बऱ्यापैकी पुर्वपदावर आली आहे असेही सांगण्यात येत आहे.
मणिपुरातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिक लष्करी तुकड्या आणि केंद्रीय पोलिस दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नाकेबंदी करून बंदोबस्त केला जात आहे. दरम्यान, आसाम रायफल्सच्या जवानांना इम्फाळमधील सर्व नागा विद्यार्थ्यांना कोहीमा येथे पोहोचण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बहुसंख्य मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या विरोधात बुधवारी कुकी आणि नागांसह अन्य आदिवासींनी निदर्शने केल्यावर दंगल उसळली त्या राज्यात सुमारे 10,000 सैन्य, निमलष्करी आणि केंद्रीय पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारामुळे अनेक स्थानिक विस्थापित झाले असून त्यांच्यासाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की एकूण 13,000 लोकांची सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात आले, काहींना लष्कराच्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आले.