सांगली – सांगलीतील जत येथील देवदर्शनाहून परत येत असताना कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जतपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ घडली.
नामदेव सावंत (वय 65), पद्मिनी सावंत (वय 60), श्लोक सावंत (वय 8), मयुरी सावंत (वय 38) आणि चालक दत्ता चव्हाण (वय 40 रा. जत) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, स्विप्ट कारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकविण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिली. यामध्ये पाच जण मयत झाले. गाणगापूरला दत्त देवाचे दर्शन घेऊन विजयपूरमार्गे जतकडे येत असताना हा अपघात मध्यरात्री घडला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हे सर्वजण जतमध्ये राहात होते. हे चौघे जण एकाच कुटुंबातील असून आजी, आजोबा सून व नातू यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वरद सावंत (वय 10) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला सांगली येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. पुढील तपास जत पोलीस करत आहेत.