एक हजार वर्षे जुनी, पाच हजार बोलीभाषांपासून तयार झालेली, अमृतातेही पैज जिंकणारी या माय मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आपण काय करतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आज हिंदी व इंग्रजी भाषेने मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलणे प्रतिष्ठेचे मानले जाते. आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करण्याकडे पालकांचा कल आहे. त्यामुळे भविष्यात ‘मराठी’ माध्यम आहे का? असा प्रश्न पडणार.
आज मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये दाखल करण्यासाठी पालक हवी तेवढी देणगी देण्यास तयार असतात. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळेचा पट कमी होऊन मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्या आहेत. मराठी साहित्य संमेलनाकडे मराठी माणूस पाठ फिरवू लागल्यामुळे मराठी पुस्तकांच्या विक्रीत घट होऊ लागली आहे. अभिजात भाषेसाठी लागणारे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत असूनही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. ही सर्व परिस्थिती मराठी भाषेच्या भवितव्याविषयी चिंता व्यक्त करावी अशीच आहे.
फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शैलीदार लेखणीतून ज्यांनी मराठी साहित्याला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले ते ज्ञानपीठ विजेते दिवंगत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, उद्या मला या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, मराठी भाषा शोधावी लागणार की काय असा प्रश्न पडला आहे.
असो, पण मला अभिमानाने सांगावेसं वाटते भारतातील 22 भाषांपैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. मराठी आणि गोवा राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 15वी तर देशातील 3 री भाषा आहे. मराठी भाषा 9व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. ‘माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन’, अशा शब्दांत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. “लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ अशा शब्दांत कविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठीचा गौरव केला आहे.