भिलार : 27 फेब्रुवारी हा दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून पुस्तकांच्या गावी गेली 3 वर्षे मराठी भाषेचा गौरव करणारे कार्यक्रम योजण्यात येतात. याही वर्षी दि. 27 व 28 फेब्रुवारी, रोजी सायं. 5 वा. पुस्तकांचं गाव भिलार येथील श्रीहनुमान मंदिराजवळील सभागृहात, राज्य मराठी विकास संस्थेतर्फे “भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम योजण्यात आला आहे. मराठी भाषेचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या लोकसाहित्याचा गौरव करणारा हा संगीतमय कार्यक्रम सांगलीतील भूपाळी ते भैरवी प्रतिष्ठान या संस्थेचे कलाकार सादर करणार आहेत, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृ. पाटील यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.
पुस्तकांचं गाव, भिलार या प्रकल्पात मराठी भाषा व साहित्याच्या जाणिवा समृध्द करणारे आणि वाचनसंस्कृतीचा विकास साधणारे कार्यक्रम वारंवार योजले जातात. त्याचबरोबर दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनही उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात विविधांगी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सर्व नागरिकांना, “मराठी भाषेचा विकास, विस्तार आणि गौरव साधला जाईल, अशा उपक्रमकार्यक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे,’ असे आग्रही आवाहन केले आहे.
पुस्तकांच्या गावात होत असलेला “भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम रसिकांसाठी विनाशुल्क असून संपत कदम, कृष्णात पाटोळे असे अनेक मान्यवर कलाकार यात सहभागी होणार आहेत. लोकसंगीत आणि इतर अनेक लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेचे वैभव असलेल्या लोकसाहित्याचा जागर या कार्यक्रमात केला जाणार आहे. लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेचा समृध्द वारसा आणि देदिप्यमान परंपरा रसिकांसमोर सादर केली जाणार आहे.
निसर्गरम्य गाव, नीरव शांतता आणि सुमारे 40 हजार पुस्तकांची सोबत अशा अनोख्या वातावरणात लोकसाहित्याचा गौरव करणाऱ्या संगीतमय कार्यक्रमाला भिलार, पाचगणी, महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे येथील, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी दोन्ही दिवस अवश्य यावे, असे आग्रही आवाहन पाटील यांनी केले आहे.