Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे लाखोच्या संख्येत मराठा बांधवांचा मोर्चा निघाला आहे. मात्र त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता भगवं वादळ मुंबईत येऊन धडकण्यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी लोणावळ्यात दाखल झाले आहे.
जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड हे जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळा येथे पोहचले आहेत. जरांगे यांच्या भेटीपूर्वी मधुकर अर्दड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांच्या अनुषंगाने शासन काम करीत असून काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, त्यासंदर्भात आम्ही जरांगे यांच्या भेटीसाठी आल्याचं अर्दड यांनी सांगितले. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील फोनवरून जरांगे यांची भेट घेणार असल्याचे म्हंटले आहे.
जरांगे यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार का? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा लोणावळा पोहचला असून येथून ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत मुंबईत दाखल होणार आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असून पोलिसांनी शहरात अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तर लोणावळा येथे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोन्ही मार्गांवर पोलिसांची कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.