मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, (Maratha Arakshan) यासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत येत्या 24 ऑक्टोबरला संपणार आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले असले तरी मराठा समाजातर्फे साखळी उपोषण हे सुरूच आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. मनोज जरांगे हे आज मुंबईत दाखल झाले असून त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील विविध विषयांवर भाष्य करत राज्य सरकारला इशारा दिला आहे. सरकारने (Shinde Fadanvis Sarkar) किमान यावेळी आंदोलन मोडून चूक करू नये, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माय बाप मराठ्यांचे रक्त पिऊ शकत नाही,आंदोलन मोडण्याची चूक आता तरी करू नका. कोणीच सापडत नाही म्हणून आमच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोप सुरू आहेत. शरद पवार यांचा यामध्ये हात असल्याचा भाजप आरोप करत आहे, पण काहीच सापडत नाही म्हणून हा उद्योग सुरू आहे. मराठे स्वत:ची भाकरी घेऊन येतात, दोन रुपये देऊन येतात. तुम्ही आरोप सिद्ध करून दाखवा, दोन पाऊल मागे येतो, असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.
दुसरीकडे 40 दिवसांनंतर आता मराठ्यांच्या हातात जातीचे दाखले येणार आहेत, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळ नावाला आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध आहे. मी माझ्या बापाचे खातो, आम्ही 1923 पासून म्हणजेच पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, आम्ही ते घेणार. गोरगरीब ओबीसींना मराठ्यांना आरक्षण हवे आहे, अशी भूमिका पुन्हा जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली.