नवी दिल्ली :- मणिपूरमधील परिस्थितीची बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानशी तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
त्यांनी म्हटले आहे की, मणिपुरमध्ये सरकारच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती असून केंद्र सरकार स्वःताहून कोमात गेले आहे. मणिपुरमधील घटनांबद्दल संपूर्ण देशभर आक्रोश आहे. त्यावर काहीही न बोलता राजस्थान, बिहार आणि पश्चिम बंगालच्या घटनांशी त्याची तुलना करणे म्हणजे लोकांचे मणिपुरवरील लक्ष अन्यत्र वळवण्याचा खटाटोप आहे. खोट्या स्वरूपाच्या तुलना करून मणिपुरचा हिंसाचार झाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एका ट्विटर पोस्टमध्ये चिदंबरम यांनी म्हटले आहे की, बिहार, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये महिलांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत हे मान्य करू या. पण त्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये सुरू हिंसाचाराकडे कसे दुर्लक्ष करता येईल.
मणिपुरमध्ये वांशिक शुद्धीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. खोऱ्यात काही कुकी उरले आहेत का? चुराचंदपूर आणि मणिपूरच्या इतर पहाडी जिल्ह्यांमध्ये काही मैईतीशिल्लक आहेत का? असा सवाल करीत त्यांनी हे विधान केले आहे.
मणिपुरमधील स्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन केल्यास तेथील घटनात्मक सरकार पूर्ण कोसळले आहे. केंद्र सरकार केवळ अकार्यक्षम आणि पक्षपाती राहिलेले नाही, तर ते घृणास्पद तुलना करून लपून राहण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रकार निर्दयी आणि क्रूर आहे, असे त्यांनी नमूद केले.