मुंबई – आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांना सोडायला लिफ्टपर्यंत आल्या होत्या, अशी आठवण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितली आहे.
ममता बॅनर्जी यांच्यावर काल सामनाच्या अग्रलेखातून कडवट टीका करण्यात आली होती. मात्र रविवारच्या सामनातील रोखठोक या सदरात त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील देण्यात आला आहे.
बैठकीमध्ये ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरेंकडे मुंबईत एका भूखंडाची मागणी केली आहे. मुंबईत पश्चिम बंगालमधून लोक उपचारांसाठी येतात. विशेषत: परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. पश्चिम बंगालला एखादा भूखंड मिळाला, तर तिथे बंगाल भवन उभारता येईल आणि अशा गरजूंची व्यवस्था करता येईल, अशी मागणी ममता बॅनर्जींनी केली.
तुमच्या कामाची मी सतत माहिती घेत असते. खूप चांगलं काम करताय तुम्ही. तुमच्याकडे पर्यटन विभाग आहे. बंगाल, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत पर्यटनाची देवाण-घेवाण वाढायला हवी. पश्चिम बंगालच्या सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाकडे महाराष्ट्रातील पर्यटनाचा ओघ आहे. तो वाढला पाहिजे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले बंगाली जनतेस आकर्षित करतात, असे ममता म्हणाल्याचे राऊत यांनी नमूद केले.
दरम्यान, या लेखात संजय राऊतांनी ममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना लिफ्टपर्यंत सोडायला आल्याचं लिहिले आहे. आदित्य ठाकरेंना निरोप देण्यासाठी त्या हॉटेलच्या लिफ्टपर्यंत चालत आल्या. तेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांना नम्रपणे थांबवले, तरीही त्या आल्या.
तुम्ही तरुणांनी आता राजकारणाची सूत्र हाती घ्यायला हवीत. माझे पाठबळ तुमच्या पाठिशी राहील. मी विद्यार्थी चळवळीपासून राजकारण करत आहे. तरुणांची शक्ती मला माहिती आहे. तुम्हीच आता पुढे यायला हवें, असं ममता बॅनर्जी आदित्य ठाकरेंना म्हणाल्याचेही या सदरात लिहण्यात आले आहे.