Mamata Banerjee letter to Kovind : देशात ‘एक देश, एक निवडणूक’ म्हणजे राज्यघटनेची मूलभूत रचना नष्ट करण्याची आणि लोकशाहीत निरंकुशता आणणारी व्यवस्था निर्माण करण्याची योजना” आहे. मी स्वैराचाराच्या विरोधात असल्याने या रचनेच्या विरोधात आहे, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या वादग्रस्त योजनवेर हल्ला चढवला.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीचे सचिव डॉ. नितेन चंद्र यांना पाठवलेल्या सविस्तर पत्रात त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
या पत्रात ममता बॅनर्जी यांनी लिहिले की, हे भारताच्या संविधानिक मूलभूत रचनेच्या विरोधात असेल. 1952 मध्ये पहिल्यांदाच लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी झाल्या. त्यानंतर काही वर्षांनी ही प्रक्रिया खंडित झाल्याचे त्यांनी म्हटले.
‘एक देश एक निवडणूक’ यात अनेक मूलभूत वैचारिक अडचणी आहेत. मला ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भात एका राष्ट्राचा अर्थ समजतो, परंतु या प्रकरणात या शब्दाचा नेमका घटनात्मक आणि संरचनात्मक परिणाम समजत नाही. भारतीय राज्यघटना ‘एक देश, एक सरकार’ या संकल्पनेचे पालन करते का?, असा सवालही त्यांनी केला.
ही संकल्पना कुठून आली याचे ‘मूलभूत कोडे’ जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणतेही ठोस मत देते कठीण असल्याचे ममता म्हणाल्या.
नजीकच्या काळात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे केवळ एका उपक्रमाच्या नावाखाली त्यांना मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका घेण्यास भाग पाडले जाऊ नये, जे निवडणुकीच्या विश्वासाचे मूलभूत उल्लंघन असेल. विविध कारणांमुळे केंद्र किंवा राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही.
गेल्या 50 वर्षात हे सातत्याने दिसून आले आहे. अशा परिस्थितीत नव्याने निवडणुका हाच पर्याय असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले.