थिरुवनंतपुरम – प्रख्यात मल्याळम कवी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या सुगताकुमारी यांचे करोना पश्चात निर्माण झालेल्या गुंतागुंतीने येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या.
करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तीव्र स्वरूपाचा न्युमोनिया झाला होता. त्यांच्या शरीराने औषधोपचाराला प्रतिसाद देण्याचे बंद केल्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
मल्याळम साहित्यातील प्रभावशाली आवाज अशी त्यांची ओळख होती.
केरळ साहित्य अकादमी पुरस्कार, केंद्र साहित्य अकादमी पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारकडून प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना 2006मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.