अजित पवार; अदानींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे अयोग्य
सातारा – अदानींबरोबर अनेक राज्यकर्त्यांचे फोटो आहेत, आमचेही आहेत. अंडरवल्ड वाल्यांबरोबर तर फोटो नाहीत ना? अदानी यांच्याबाबत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने समिती नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अदानींना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे सध्या अयोग्य आहे. अदानी मुद्यावरुन महाविकास आघाडीत कोणाचीही नाराजी नसून खा. शरद पवार, खा. सोनिया गांधी व उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी राज्यात मजबूत आहे, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेत एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अदानी मुद्यावरुन दररोज वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत. या मुद्यावरुन सगळ्यांचेच एकमत आहे असे नाही. मात्र काही लोक संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. अदानींबरोबर खा. शरद पवारांसह अनेक राज्यकर्त्यांचे फोटो आहेत. अदानी काही गुन्हेगार नाहीत. त्यांच्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अदानींबरोबरच फोटो काढलेत, ना कुठल्या अंडरवल्डवाल्याबरोबर तर नाहीत ना, असा प्रश्न श्री. पवार यांनी केला. राज्यात टाटा, बिर्लांनी मजबूत पाया रचला . अंबानी, अदानी पण नावाजलेले उद्योगपती आहेत. राज्यात, देशात फिरत असताना अनेक कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक फोटो काढत असतात. त्यांना अडवता येत नाही. त्यामुळे असे फोटो व्हायरल करुन समाजात संभ्रम निर्माण करु नये, असे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारपुढे जोरदार पर्याय निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राज्यात भक्कम असल्याचे दिसून आले आहे. अदानी प्रकरणावरुन प्रत्येकाचे मत वेगवेगळे असले तरी या मुद्यावरुन महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. खा. शरद पवार, खा.सोनिया गांधी, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची मोट मजबूत असून कोणीही त्यात फुट पाडू शकत नाही. राज्यात सध्या सरकारचे कशावरच नियंत्रण नसून कुणी फडतूस म्हणायचे, कुणी काडतूस म्हणायचे असले उद्योग सध्या सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
जिल्हा बँकेमुळे माझा राजकारणात प्रवेश झाला असून संस्था चालवणारे चांगले असले की संस्था चांगल्या प्रकारे चालत असतात. सातारा जिल्हा बँक देशभरात नावाजलेली बँक असून अनेक दिग्गजांनी या बँकेचे नेतृत्व केले आहे. सध्या नितीन पाटील यांच्या रुपाने तरुण नेतृत्व ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी मजबूत असून सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका तात्काळ घ्याव्यात, अशी मागणी अजित पवार यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौर्यावर टीकास्त्र
प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे देवदर्शनाला जाण्याचा अधिकार आहे. आम्ही पण देवदर्शन करतो. मात्र, त्याची प्रसिध्दी करत नाही. मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौर्यावर गेलेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याचा फारसा गाजावाजा करायची गरज नाही. आमचेही अनेक खासदार, आमदार देवदर्शनाला जातात. मात्र, कधी गाजावाजा करत जात नाही. देवदर्शनावरुन आल्यावर प्रसाद देतात तेव्हा आम्हाला समजते. आम्ही सर्व जाती, धर्म यांना समान मानतो. सर्व जाती, धर्मियांचा आम्हाला अभिमान आहे. मात्र, काही लोकांकडून जाती- धर्मात फुट पाडणे, तेढ निर्माण करण्याचे उद्योग सुरु असून अशा प्रकाराला त्यांनी आळा घालावा, अशा शब्दांत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौर्यावर टीकास्त्र सोडले.
आता स्टँपवर लिहून देवू का…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष भक्कम असून आमच्या पक्षात कोणाचीही नाराजी नाही. राज्यात सर्वाधिक मजबूत परिस्थितीत आमचा पक्ष आहे. मात्र, जाणीवपूर्वक अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार नाराज अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. वास्तविक पित्ताचा त्रास असल्याने एक दिवस मी डॉक्टरांच्या सल्ल्याने आराम घेतला होता. याबाबत मी कालच स्पष्टीकरण दिले होते. मात्र, पुन्हा त्याच विषयांवरील प्रश्न विचारले जात असतील तर आता स्टँपवर लिहून देऊ का, अशा शब्दांत अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. महागाई, बेरोजगारी कमी कधी होणार, महिला व युवतींवर अन्याय, अत्याचार कमी कधी होणार यावर प्रसारमाध्यमांशी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.