पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यात काॅंग्रेसला तगडा उमेदवार दिल्यास भाजपला पुण्यातच रोखणे शक्य होईल. त्यामुळे, काॅग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे याबाबत चर्चा करावी, अशी मागणी महाविकास आघाडीत घटकपक्षांनी थेट शरद पवार यांच्याकडे केली आहे. पुण्यात भाजपच्या उमेदवारासमोर काॅंग्रेसने किरकोळ उमेदवार दिल्यास महायुती पुण्यातील जागेबाबत निश्चिंत होऊन बारामती आणि शिरूरमध्ये ताकद लावेल. त्याचा फटका दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीलाच बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पुणे जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी स्वत: शरद पवारांनी कंबर कसली असून त्यांनी पुण्यात मुक्काम ठोकला आहे. आघाडीच्या जागावाटपात जिल्ह्यातील चार जागांमध्ये शरद पवारांकडे बारामती आणि शिरूरची जागा आहे. काॅंग्रेसकडे पुणे, तर मावळची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे असेल.
बारामती आणि शिरूरसाठी शरद पवारांविरोधात थेट अजित पवारच असल्याने त्यांना भाजपची रसद मिळणार आहे. लोकसभा निवडणूक शरद पवारांसाठी आव्हानात्मक ठरणार असून, कौटुंबिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पवार हे जिल्ह्यात आपल्या राजकीय अनुभवाचा कस लावत रणनिती आखत आहेत.
मात्र, भाजपने बारामतीची जागा प्रतिष्ठेची करत “आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे,’ असे जाहीरच केले आहे. त्यामुळे पवारांनी जिल्ह्यात विशेष लक्ष घातले आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजप बारामती आणि शिरूरमध्ये ताकदीने मदत करणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपला पुण्यातच रोखल्यास राष्ट्रवादीला त्याचा फायदाच होणार आहे.
ही बाब लक्षात घेता स्वत: पवार यांनी काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केली आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर तगडा उमेदवार दिल्यास भाजपला पुण्यातच जोर लावावा लागेल. ही बाब लक्षात घेऊन काॅग्रेसने किरकोळ उमेदवार देऊ नये याबाबत चर्चा करण्याची विनंती केली जात आहे.
काॅंग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष
पुण्यात पक्षातील नेत्यांकडून काॅग्रेसच्या उमेदवारी बाबत केलेल्या मागणीवरून आपण काॅग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील आठवड्यात इंडिया आघाडीची बैठक त्यात ही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपने उमेदवार घोषित करत प्रचारसाठी जवळपास दीड महिन्यांचा कालावधी दिला आहे. तर, काॅंग्रेस कोणता उमेदवार देणार? आणि कधी घोषणा करणार? याबाबत उत्सुकता आहे.