नगर – जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत एकाकी लढत देत भाजपने दुसऱ्या क्रमांक मिळाला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र जिल्ह्यावरील आपली पक्कड कायम ठेवून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत पहिला क्रमांकचा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून 203 ग्रामपंचायतींपैकी 124 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. तर भाजपला 62 ग्रामपंचायतींवर यश मिळले आहे. उर्वरित 17 जागांवर स्थानिक आघाड्या व अपक्षांनी झेंडा फडकविला आहे. या निवडणुकीत माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना धक्का देत सरपंच खेचून आणले आहे. तर माजीमंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना चिरंजीवच्या पराभवला समोरे जावे लागले आहे.
पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही संस्था गावपातळीवर सर्वात महत्वाची असून ती ताब्यात आल्या म्हणजे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढणे सोपे जाते. त्यादृष्टीने जिल्ह्यात या निवडणुकीला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महत्व देखील कार्यकर्त्यांनी बळ देण्याचा प्रयत्न केला. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीला या ग्रामपंचायत निवडणुकीचा फायदा मिळविण्याच्या दृष्टीने यंत्रणा राबविण्यात आली.203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना मतदारांनी जागा दाखवून दिली असून तरूणांना संधी देण्यात आली आहे.
श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचुपतेंना कुटुंबातील कलह नडला असून त्यांच्या पुतण्यानेच मुलाचा पराभव केला आहे. काष्टीच्या निवडणुकीत आ.पाचपुते यांचे पुतणे साजन सदाशिव पाचपुते यांनी स्थानिक विरोधी गटाशी हातमिळवणी करून या निवडणुकीत आ. पाचपुते गटाने सतरापैकी दहा जागा जिंकत बहुमत मिळवले. तसेच सरपंचपदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते यांनी प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांचा 190 मतांनी पराभव करीत आ. पाचपुते गटाला मोठा धक्का दिला. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक सात ग्रामपंचायती जिंकल्या असून दोन ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी सत्ता काबीज केली. या निवडणुकीत आ. पाचपुते गटाला खातेही उघडता आले नाही. तर कॉंग्रेसचे राजेंद्र नागवडे गटही कोठेच दिसला नाही.
राहुरी तालुक्यात 11 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीने प्रत्येकी चार ग्रामपंचायतींवर विजय मिळविला असून उर्वरित तीन ग्रामपंचायतींवर अपक्षांची वर्धी लागली. कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे गटाने मुसंडी मारत 15 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे गटाला 9 ग्रामपंचायतीवर यश मिळवता आले तर एका ठिकाणी उद्धव ठाकरे प्रणीत शिवसेनेचा सरपंच तर एका ठिकाणी अपक्ष सरपंचाची वर्णी लागली.
शेवगाव तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने 7, भाजपने 3 तर जनशक्ती विकास आघाडी व अपक्ष प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत 12 पैकी 10 ग्रामपंचायतीत महिलांनी बाजी मारली आहे. राहाता तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाला निर्विवाद यश मिळाले आहे. अर्थात बारापैकी एका ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. 26 ग्रामपंचायतींवर माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व दिसून आले. तर 9 ग्रामपंचायती मंत्री राधाकृष्ण विखे गटाकडे गेल्या आहेत. तर घुलेवाडी व निळवंडे ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच विजय झाले आहेत. यामध्ये आ. थोरात यांच्या जोर्वे गावामध्ये सरपंच विखे गटाचा निवडून आला असून तळेगाव दिघे, कोल्हेवाडी हे विखे गटाकडे गेले आहेत. तर निळवंडे गावामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या सासूबाई अपक्ष म्हणून निवडून आल्याने तालुक्यात निळवंडे गाव आकर्षणाचा विषय ठरला आहे.
कर्जत तालुक्यातील 8 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे माजीमंत्री आमदार प्रा. राम शिंदे व मित्रपक्षांचे वर्चस्व सिद्ध झाले. 8 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 6 ग्रामपंचायतीवर भाजप व मित्रपक्षांनी झेंडा फडकल्याने आ. शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे. या तालुक्यातील कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळूखे यांना गावच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
नेवासा तालुक्यात 13 ग्रामपंचायतींवर माजीमंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने बाजी मारून पुन्हा एकदा तालुक्यावर आ. गडाखांचाच वरचष्मा असल्याचे सिद्ध झाले. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना कांगोणी या गावातून त्यांच्या मेव्हण्याचे पैनल देखील निवडून आणला आले नाही.जामखेड तालुक्यात चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रत्नापुर व राजुरीमध्ये राष्ट्रवादी तर शिऊर ग्रामपंचायतमध्ये भाजपकडे सरपंच आले आहे.
पाथडीत तालुक्यातील 11 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम ठेवले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती या पक्षांचे खाते उघडले. राष्ट्रवादीनेही स्थानिक आघाडी करून अनेक ठिकाणी शिरकाव केला. भालगाव, कोरडगाव, तिसगाव, कोल्हार, मोहरी, वैजू बाभुळगाव, जिरेवाडी या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या निवडणुकीत भाजपांतर्गत लढत काही ग्रामपंचायतींमध्ये झाल्या. भाजपच्या तालुकाध्यक्षांना त्यांच्या गावात पराभवाला सामोरे जावे लागले.
पारनेर तालुक्यातील आमदार नीलेश लंके यांनी बाजी मारली आहे. 16 ग्रामपंचायतींपैकी 13 वर वर्चस्व मिळविले आहे. दोन ग्रामपंचायती ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. अकोले तालुक्यात पुन्हा एकदा वैभव पिचड यांना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दे धक्का देत 11 पैकी 10 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविले आहे. नगर तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी बाजी मारली आहे. श्रीरामपूर तालुक्यात मात्र स्थानिक आघाडी झाल्याने निकाल देखील संमिश्र लागला आहे. काही ठिकाणी मुरकुटे-ससाणे विजयी तर काही ठिकाणी आदिक, मुरकुटे, ससाणे विजयी झाले आहे. आमदार लहु कानडे गटाने काही ठिकाणी विखे गटावर आघाडी केल्याचे दिसून आले.