पुणे – महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभला असताना महाराष्ट्रात एकही “भारत गौरव ट्रेन’ येणार नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयला आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) महाराष्ट्राचा विसर पडला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्र सरकारच्या कल्पनेनुसार “देखो अपना देश’ आणि “एक भारत श्रेष्ठ भारत’ या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने देशाच्या विविध भागांतून “भारत गौरव’ पर्यटन ट्रेन चालू केल्या आहेत. भारतातील समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दाखवण्याची या ट्रेनची संकल्पना आहे.
आतापर्यंत देशातील विविध ठिकाणांहून 28 भारत गौरव ट्रेन चालविण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातून आतापर्यंत दोन ते तीन ट्रेन सोडण्यात आल्या आहेत आणि मे महिन्यात आणखी दोन ट्रेन सोडण्यात येणार आहेत. पण, महाराष्ट्रात मात्र एकही ट्रेन आली नाही. महाराष्ट्रात शिर्डी, त्रंबकेश्वर, भिमाशंकर, महालक्ष्मी, छत्रपती संभाजी नगर येथील लेण्या, महाबळेश्वर अशी सांस्कृतीक आणि धार्मिक वारसा लाभलेली स्थळे असताना महाराष्ट्रात इतर राज्यातून एकही “भारत गौरव ट्रेन’ चालविण्यात आली नाही. यावरून रेल्वे मंत्रालयाला महाराष्ट्रातील सांस्कृतीक आणि धार्मिक वारसाचा विसर पडला की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयआरसीटीसीकडून ह्या सर्व समावेशक टूर ऑफर केल्या जात आहे. भारत गौरव ट्रेनसाठी विशेष एलएचबी कोच जोडण्यात आल्या आहेत. टूर दरम्यान संपूर्ण ऑन-बोर्ड तसेच ऑफ-बोर्ड जेवण, रस्त्यांवरील वाहतूक सेवा आणि दर्जेदार बसेसमध्ये प्रेक्षणीय स्थळे दाखवणे, प्रवासांच्या कार्यक्रमानुसार निवास व्यवस्था, टूर एस्कॉर्टसची सेवा, प्रवास विमा, ऑन-बोर्ड सुरक्षा आणि हाऊसकीपिंग याशिवाय पर्यटकांसाठी नियोजित विविध ऑन-बोर्ड मनोरंजन उपक्रम यांचा समावेश केला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक वारसा स्थळे आहेत. रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीने महाराष्ट्रातील धार्मिक आणि पर्यटन स्थंळाचे विषेश पॅकेज तयार करून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी.
– निखील काची,सदस्य, रेल्वे सल्लागार समिती
महाराष्ट्रातून भारत गौरव ट्रेन
मुंबई – 23 मे
पुणे – 11 मे