शंभूराज देसाई; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, योजनेअंतर्गत 25 हजार पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ
कराड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्यावतीने सध्या सर्वत्र “शासन आपल्या दारी’ ही योजना राबविण्यात येत आहे. पाटण (दौलतनगर) येथे या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवार, दि. 13 रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार असून या योजनेंतर्गत पाटण तालुक्यातील 25 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवार, दि. 9 रोजी “शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, शासनाच्या विविध योजना सामान्य, गरजू लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने शिवदुतांची निर्मिती केली आहे. नुकतेच साताऱ्यात 350 शिवदूतांना प्रशिक्षण देण्यात आले. हे शिवदूत गावोगावी, घरोघरी जाऊन शासनाच्या कोणत्या विभागाच्या किती योजना आहेत, त्यासाठीचा अर्ज कोठे व कसा भरायचा, याबाबतची तांत्रिक माहिती लोकांना समजावून सांगणार आहेत. पात्र लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नये, हा शासनाचा प्रयत्न आहे.
त्यानुसार जिल्हास्तरावर प्रत्येक पालकमंत्र्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून योजनेचा निधी कमी आणि लाभार्थी जास्त झाल्यास अधिकच्या लाभार्थ्यांसाठी पुरवणी मागणीच्या माध्यमातून निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे सरकार शासकीय योजना शेतकऱ्यांच्या दारात घेऊन जाणारे आहे. असे पहिल्यांदाच घडत असून शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या कृतीतून हे सिद्ध केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईच्या बैठकीत धरणग्रस्तांसाठी वेळ राखीव
धरणग्रस्तांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील बैठकीसाठी राखीव वेळ ठेवली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नियोजित बैठक होऊ शकली नाही. परंतु, त्यांनी मुंबईतील बैठकीत धरणग्रस्तांसाठी आपला वेळ राखीव ठेवला आहे. तसेच शनिवारच्या कार्यक्रमातही वेळ मिळाल्यास धरणग्रस्तांच्या ठराविक प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांची भेट घालून देणार असल्याचेही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.
… तर जिल्हास्तरावर तोडगा काढला असता
सध्या कृषी सन्मान योजना राबवण्याबाबत कृषी विभाग व महसूल विभागाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले, कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी पात्र आहे की नाही? हे पाहण्यासाठी महसूल विभागाला त्यात सहभाग घ्यावा लागतो. मात्र, ही योजना कृषी विभागाचीच असून महसूल आणि कृषी विभागामध्ये योजना राबवताना समन्वयाचा अभाव होतोय का? याबाबत कृषीमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. परंतु, आतापर्यंत याबाबत तक्रार आली असती; तर याआधीच आपण जिल्हास्तरावर तोडगा काढला असता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
… शेतकऱ्यांनीच निवडणूक हातात घेतली
पाटण शेती उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले. दरम्यान, पणन विभागाचे गृहराज्यमंत्री पद माझ्याकडे असताना राज्यातील विविध बाजार समित्यांचे प्रस्ताव आले. मात्र, त्यात पाटण बाजार समितीचा प्रस्ताव नव्हता. बाजार समितीत सत्ता मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण मंत्र्यांशी पाटण बाजार समितीची सध्याची आर्थिक स्थिती, नफा-तोटा पत्रक मागितले असून भविष्यात पाटण बाजार समितीसाठी राबवण्यात येण्यासंदर्भातील योजनांबाबतची माहितीही घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीने निराशाच केल्याने शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन सत्तांतर घडवले, असेही त्यांनी पालकमंत्र्यांनी सांगितले.