भंडारा :- “मी अत्यंत जबाबदारीने सांगतो. उद्या शरद पवार भंडाऱ्यात आले, तर आपण स्वतः त्यांच्या स्वागताला जायचे. ते येतील. भाषण करतील. आपल्या विरोधातही बोलतील. पण आपण निमूटपणे ऐकून घ्यायचे. बापाने खडेबोल ऐकवले, तर वाईट मानून घ्यायचे नाही. यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही,’ असे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
अजित पवारांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. बंडखोरीनंतर प्रारंभी राष्ट्रवादीच्या शरद व अजित पवार गटाने एकमेकांवर तुफान चिखलफेक केली. पण आता या दोन्ही गटांचे सूर जुळताना दिसून येत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्या वरील विधानावरून याचीच प्रचिती आली आहे.
पटेल पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार माझे नेते होते, आहेत व उद्याही राहतील. त्यांच्याविषयीचा आदर व सन्मान केव्हाही कमी होणार नाही. पण राजकारणात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात.
आता आम्ही बाळ राहिलो नाही. एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून निर्णय घेतला आहे. आता शेवटपर्यंत आपण सर्वजण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच राहणार आहोत, असेही पटेल यावेळी म्हणाले.