मुंबई – करोनाच्या नव्या संकटाला रोखण्याच्या निमित्ताने राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन नियमावलीमध्ये लसीकरण पूर्ण न करणाऱ्या व्यक्तींना पाचशे रुपये दंड व दुकानांमध्ये लसीकरण पूर्ण न केलेला ग्राहक आढळल्यास दहा हजार रुपये दंडाची केलेली तरतूद ही व्यापारी वर्गांमध्ये अराजकाला आमंत्रण देणारी आहे, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) महाराष्ट्र उपाध्यक्ष अध्यक्ष सुरेश भाई ठक्कर यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की, सदर तरतूद व्यापाऱ्यांच्यावर अन्याय करणारी आहे. व्यापारी आपल्या आस्थापनांमध्ये लसीकरण पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देतील. परंतु ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला देणे हे तर्कसंगत नाही.
त्यामुळे सरकारने दंडाची ही तरतूद त्या त्या व्यक्तीला लागू करावी. व्यापारी आस्थापनांना दंड आकारणी करण्याची तरतूद रद्द करावी अशी मागणी चेंबरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.