कानपूर – रवीचंद्रन अश्विनची विक्रमी कामगिरी व रवींद्र जडेजाने घेतलेल्या चार बळींनंतरही न्यूझीलंडने कडवा प्रतिकार करत पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल व राचीन रवींद्र या अखेरच्या जोडीने तब्बल 52 चेंडू खेळून काढले व न्यूझीलंडचा पराभव टाळला.
रविवारच्या 1 बाद 4 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर टॉम लॅथमने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने नाइट वॉचमन विल्यम सोमरविले व कर्णधार केन विल्यमसनच्या साथीत संघाचा डाव सावरला. सोमरविलेने 110 चेंडू खेळून काढताना 36 धावांची खेळी केली. तर, लॅथमने आपल्या 52 धावांच्या खेळीत 146 चेंडूंचा सामना केला. तो बाद झाल्यावर न्यूझीलंडचा संघ पराभवाच्या छायेत आले होते. मात्र, कर्णधार केन विल्यमसनने किल्ला लढवताना अत्यंत संयमी 24 धावांची खेळी करताना तब्बल 112 चेंडू खेळून काढले. तो देखील बाद झाल्यावर मात्र, रवींद्र जडेजा व अश्विन यांनी त्यांच्या अन्य फलंदाजांना स्वस्तात बाद केले.
पाचव्या व अखेरच्या दिवसाचा खेळ संपण्यास एक तास बाकी असताना रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी अत्यंत काळजीपूर्वक फलंदाजी करत एकेक चेंडू खेळून काढला व भारताच्या गोलंदाजांना एकही यश मिळू दिले नाही. अखेर अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला व सामना अनिर्णित राहिला.
त्यावेळी न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात 98 षटकात 9 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. रवींद्रने 91 चेंडूंचा सामना करत नाबाद 18 तर पटेलने 23 चेंडूंचा सामना करताना 2 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 4 तर रवीचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले. अक्सर पटेल व उमेश यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
या कसोटीत पदार्पण करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. आता या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येत्या 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
उत्तरेत सामने कशासाठी
भारतात सध्या हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पूर्वेकडील तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये लवकर सूर्यास्त होतो. त्यामुळे दुपारनंतरच अंधुक प्रकाशाने अनेक सामन्यांमध्ये व्यत्यय आल्याचे दिसून आले आहे. तरीही बीसीसीआय याच कालावधीत या राज्यांमध्ये सामना का आयोजित करते हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा सामना मुंबईत होत असल्याने त्यात निकाल लागण्याची अपेक्षा आहे. मात्र, केवळ पूर्व परंपरागत रोटेशन पद्धतीने सामन्यांचे यजमानपद उत्तर व पूर्वेकडील राज्यांना देण्यापेक्षा त्यावेळच्या ऋतूंनुसार सामन्यांचे ठिकाण आयोजित केले तर प्रत्येक सामन्यात निकाल हाती येईल, अशी मतेही अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहेत.
अश्विनने रचला इतिहास
भारतीय संघाचा ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत इतिहास रचला. अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकत कारकिर्दीतील 80 व्या कसोटी सामन्यात 418 बळींचा टप्पा गाठला. त्यामुळे त्याचा समावेश भारतासाठी 400 पेक्षा जास्त बळी घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत झाला आहे. भारताकडून अनील कुंबळेने 132 कसोटीत 619 बळी घेतले आहेत. महान गोलंदाज कपिल देव यांच्या नावावर 131 कसोटी सामन्यांमध्ये 434 कसोटी बळी आहेत.
गिल नव्हे सुपरमॅन
भारताचा शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जबरदस्त झेल घेतला. सामन्याच्या पाचव्या दिवशी दुसऱ्या सत्रात उमेश यादवच्या गोलंदाजीवर गिलने सुपरमॅनप्रमाणे सूर मारून विल सोमरविलेचा झेल घेतला. उमेशने टाकलेल्या उसळत्या चेंडूवर सोमरविलेने पुल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डीप फाइन लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या गिलने सूर मारून हा झेल टीपला.
सेकंदाच्या उशिरामुळे विल यंग बाद
विल यंग आणि टॉम लॅथम फलंदाजी करत असताना रवीचंद्रन अश्विनने विल यंगला पायचित बाद केले. त्यावेळी यंगने लॅथमशी चर्चा करण्याच वेळ दवडला व त्यावेळेत डीआरएसची मदत असलेली 15 सेकंदे पुर्ण झाली व त्याला पंचांच्या निर्णयाला आव्हानच देता आले नाही. त्यामुळे पंचांनी त्याला बाद ठरवले असल्याने मैदान सोडावे लागले. वास्तविक रिप्लेमध्ये अश्विनचा चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडून अन्यत्र जाऊ शकत असल्याचे दिसून आले. हा डीआरएस घेतला असता तर यंग नाबाद ठरला असता.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 345. न्यूझीलंड पहिला डाव – 296. भारत दुसरा डाव – 81 षटकांत 7 बाद 234 धावा घोषित. न्यूझीलंड दुसरा डाव – 98 षटकांत 9 बाद 165 धावा. (टॉम लॅथम 52, विल्यम सुमेरविल्स 36, केन विल्यमसन 24, राचीन रवींद्र नाबाद 18, एजाज पटेल नाबाद 2, रवींद्र जडेजा 4-40, रवीचंद्रन अश्विन 3-35, अक्सर पटेल 1-23, उमेश यादव 1-34).