जळगाव – महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव सुरु आहे. या महोत्सवासाठी देशभरातून भाविक पोहोचले आहेत. एकीकडे शिवमहापूराण कथा सुरु आहे तर दुसरीकडे रुद्राक्ष वाटप सुरु आहे. रुद्राक्ष घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बुधवारी, गुरुवारी तब्बल 5 लाखाहून अधिक जणांना रूद्राक्षचे वाटप करण्यात आले आहे. मात्र यादरम्यान मोठी गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली.
धक्काबुक्कीत महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली होती. त्यानंतर आता गर्दीमुळे रूद्राक्ष घेणे शक्य न झाल्याने माघारी परतताना गाडीचा अपघात होऊन दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर सीहोर येथे अचानक प्रकृती खराब झाल्याने एका बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान रूद्राक्ष महोत्सवादरम्यान महाराष्ट्रातील 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
आज पहाटे रुद्राक्ष महोत्सवावरून घराकडे परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. शुक्रवारी ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 4 भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की यात भााविकांचे वाहन पूर्ण चक्काचूर झाले आहे. शोभाबाई लुकडू पाटील (वय-52), कमलबाई आत्माराम पाटील (वय-52 दोन्ही रा. पातोंडा. ता अमळनेर) अशी दोन्ही मयत महिलांची नावे असून त्या एकाच कुटुंबातील आहेत. या महोत्सवासाठी देशभरातून 10 लाखावर भाविक आले होते. त्यामुळे महामार्गावर 20 किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मोबाईल नेटवर्क विस्कळीत झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवकथा महापुराण आणि रुद्राक्ष महोत्सवासाठी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची 4 वाहने 13 फेब्रुवारी रोजी सीहोरला गेली होती. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले. मात्र, रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांनी रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाली. मात्र यावेळी वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन झाडावर आदळले आणि भीषण अपघात झाला. जखमी चार जणांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती पातोंडा गावात समजताच एकच खळबळ उडाली आहे. मयत शोभाबाई व कमलबाई या दोघांचे नातेवाईक मध्यप्रदेशकडे रवाना झाले होते मृतदेह घेऊन ते काही वेळाने अमळनेर या गावात पोहचत आहे. मयत शोभाबाई लुकडू पाटील यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पती शेती करतात. तर मयत कमलबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. दोघांचे पती एकमेकांचे भाऊ आहेत. दोघी जावांचे निधन झाल्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.