पेपर द्रोण आणि पत्रावळी मशीनवर तयार करून विक्री करण्याचा आगळा व्यवसाय कीर्ती म्हात्रे यांनी यशस्वी केला
होता. पण गेल्या वर्षी चिपळूणमध्ये महापुराने हाहाःकार माजविला. त्या महापुराने कीर्ती यांच्या व्यवसायालाही मोठा तडाखा दिला. त्या राहतात तो सारा परिसर पुराच्या पाण्यात होता. कीर्ती यांच्या साऱ्या मशीन्स पाण्याखाली गेल्या. काही दिवस त्या मशीन्स पाण्यात राहिल्यामुळे त्या गंजल्या आणि निरुपयोगी झाल्या. त्यांना एकट्यालाच नव्हे तर साऱ्याच चिपळूणकरांपुढे मोठे संकट उभे राहिले होते.
सारे व्यावसायिक निसर्गाच्या या रौद्ररुपाने कोसळून गेले होते. कीर्ती यांच्या ऐंशी किलो वजनाच्या साडेचार लाख रुपयांच्या मशिनी भंगार झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या संकटात पुन्हा एवढे भांडवल उभे करणे अशक्यप्राय गोष्ट होती. सरकारने पूरग्रस्तांसाठी 50 हजारांची मदत
जाहीर केली होती. परंतु, ती तुटपुंजी मदत अजूनही मिळालेली नाही.
पूर ओसरला पण विवंचना सरल्या नाहीत. संकटातून बाहेर कसे यायचे हा प्रश्न सर्वांसमोरच होता. कीर्ती यांनी काही घरगुती उद्योग करुन सावरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी केलेले खायचे पदार्थ सर्वांना आवडायचे. त्यामुळे त्यांनी असे पदार्थ तयार करुन देणे आणि जेवणाचे डबे देण्याची कल्पना पुढे आणली. तिला प्रतिसाद मिळू लागला. आणि पूर्वीपेक्षा वेगळ्या केटरिंगच्या व्यवसायातूश त्या उभ्या राहू लागल्या. कीर्ती यांचे माहेर आणि सासर दोन्ही पेणचे (जि. रायगड). पती केमिकल इंजिनिअर असल्याने त्यांच्या कामासाठी म्हणून हे कुटुंब चिपळूणमध्ये आले. मुले लहान असताना काही घरगुती उद्योग सुरु करायचा म्हणून कीर्ती यांनी द्रोण आणि पत्रावळी बनविणे सुरु केले.
त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने भांडवल गुंतवून तो व्यवसाय वाढवला. घरच्यांना आर्थिक आधारही मिळू लागला. त्यावेळीही केटरिंगचे काम त्या काही प्रमाणात करत होत्या. त्याचदरम्यान माणदेशीशी संपर्क आला. माणदेशीकडून केटरिंगची कामे मिळत गेली. छोटी मोठी घरगुती जेवणे व पार्ट्यांसाठी केटरिंगच्या आँर्डरस् मिळू लागल्या. करोना आला. लॉंकडाऊनमुळे सारेच बदलून गेले. करोनाच्या पहिल्या वर्षात क्वारंटाइन असणाऱ्या व्यक्तींसाठी पॅंकिंगमध्ये जेवण पोहचविण्याचे काम त्यांनी केले. खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यास त्या शिकल्या. विशेषतः चायनीज व केकचे प्रकार त्या शिकल्या. करोना काळात वाढदिवस किंवा घरगुती आँर्डरस् त्या घेऊ लागल्या.
पुराच्या संकटानंतर या केटरिंगच्या कामानेच त्यांना हात दिला. घरगुती पदार्थांची चव लोकांना आवडल्याने त्यात भर पडली. माणदेशीने या कामासाठी आणखी प्रोत्साहन दिले. या कामासाठी दोन महिला व एक पुरुष अशा तिघांची मदत घ्यावी लागली. आँर्डरस् वाढल्यावर बचत गटाच्या महिलांकडून चपात्या तयार करुन घ्यायला सुरुवात केली. त्या महिलांनाही रोजगार मिळू लागला. माणदेशी संस्थेच्या कार्यशाळांमध्ये लाडू, केक, जाम जेली तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्या इतर महिलांसाठी मेंटॉंर बनल्या. पेपर द्रोण, पत्रावळी, मातीची भांडी विक्री, जेवणाच्या आँर्डरस कसे सारे व्यवस्थित सुरु होते. महापुरानंतर द्रोण पत्रावळीच्या कामासाठी लागणारी मशीनरी खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे केटरिंगकडेच अधिक लक्ष दिले. जेवणाचे डबे देण्याबरोबरच स्नॅंक कॉंर्नर सुरु करायचे ठरवले.
सासूसासरे निव्रुत्त शिक्षक आहेत. त्यांचाही मोठा पाठिंबा मिळाला. मेंटॉंर म्हणून काम करत असताना माणदेशीकडून खूप काही शिकताही आले. संकटात आर्थिक मदत मिळाली. केटरिंगच्या व्यवसायासाठी ओळखी वाढल्या. त्याशिवाय मेणबत्ती तयार करणे, विविध प्रकारचे पापड तयार करणे, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविणै शिकून घेतले. खाद्यपदार्थ तयार करण्यात इंटरेस्ट असल्याने फायदा झाला. आता स्नॅंक कॉंर्नर सुरु केला आहे. घरगुतीचव कायम राहिल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला. पारंपरिक पदार्थाप्रमाणे नवीन पिढीला आवडणारे पदार्थ शिकून घेतले. त्यामुळे वडापाव, मिसळ ,पोहे असे पारंपरिक पदार्थ तयार करण्याबरोबरच बर्गर, पिझ्झा असे पदार्थ स्नॅंक कॉंर्नरमध्ये त्या तयार करतात. महापुरासारख्या संकटात सर्वस्व उध्वस्त झाल्यावर किती निराशा येते याची कल्पना करणेही अशक्य. मात्र, खचून न जाता संकटावर मात करत पुन्हा नव्याने लढाई जिंकण्याची जिगर दाखवत कीर्ती म्हात्रे यांनी केलेला संघर्ष इतरांनाहीअनुकरणीय असाच आहे