Praveen Darekar On Srirang Barane| पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्र्यांसह ७२ जणांना रविवारी शपथ देण्यात आली. त्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) करण्यात आले. मात्र यावरून शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाकडे सात खासदार असूनही पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले नाही. फक्त राज्यमंत्रीपदाचा स्वतंत्र कारभार देण्यात आले. आम्हाला कॅबिनेटपदाची अपेक्षा होती, अशी खंत बारणे यांनी व्यक्त केली होती. त्यावर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता आहे. जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांचे आले असते. परंतु आपण मंत्री झालो नाही मग कुठेतरी आपला संताप, नाराजी व्यक्त व्हायला पाहिजे या भूमिकेतून त्यांचे वक्तव्य आले आहे,’ अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, “आपण एका विचारधारेवर हिंदुत्वाच्या भूमिकेवर एकनाथ शिंदेंसोबत युती केली. जागांसाठी आपण एकत्र आलो नाही. तशीच भूमिका बारणे आणि सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. लोकसभा निवडणुकीनंतर आता बारणे बोलत आहेत. महायुतीतील अंतर्गत गोष्टी जाहीरपणे न बोलता चार भिंतीत पक्षाच्या व्यासपीठावर बोलाव्यात अशी अपेक्षा सर्व महायुतीतील नेत्यांची प्रवक्त्यांची आहे. १०५ आमदार भाजपाचे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले,” असेही दरेकर म्हणाले.
महायुतीत राहून अशा प्रकारची एकमेकांबाबत नाराजी व्यक्त करणे योग्य आहे असे मला वाटत नाही. श्रीरंग बारणे यांची नाराजी ना पक्षाकरिता, ना अजित पवारांकरिता, ना शिंदेंकरिता आहे. जर बारणे प्रतापराव जाधव यांच्याजागी मंत्री झाले असते तर राज्यमंत्री पदातही समाधान आहे अशा प्रकारचे वक्तव्य… pic.twitter.com/emO38vn9f4
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) June 10, 2024
काय म्हणाले श्रीरंग बारणे?
एनडीएतील अन्य घटक पक्षातील काहींना १-१ खासदार असतानाही त्यांना कॅबिनेटपद देण्यात आलं मग भाजपाने शिवसेनेबाबत अशी भूमिका का घेतली? आम्हाला कॅबिनेटपदाची अपेक्षा होती. चिराग पासवान यांना ५ खासदार आहेत. मांझींकडे १ खासदार आहे. अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यादेखील पक्षाच्या एकमेव खासदार आहेत.
जेडीएसकडे २ खासदार तरीही त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. इतर पक्षांना एक आणि शिवसेनेला वेगळा न्याय दिला गेला. प्रतापराव जाधव यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असती, तर आम्हाला समाधान वाटले असते. मग ७ लोकसभा खासदार असतानाही शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद स्वतंत्र प्रभार का मिळाले?” असा सवाल श्रीरंग बारणे यांनी केला होता.
हेही वाचा: