मुंबई – राज्यातील लोकसभेच्या ८ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होईल. त्यासाठी ३५२ उमेदवारांनी ४७७ अर्ज दाखल केले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ( Lok Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. आता त्या अर्जांची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत ८ एप्रिल आहे.
राज्यातील बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हे मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जातील. त्यापैकी नांदेडमध्ये सर्वांधिक ७४ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले. तर, वर्ध्यात सर्वांत कमी म्हणजे २७ उमेदवारांनी ३८ अर्ज सादर केले.
राज्यात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. त्यासाठी १९ एप्रिलपासून ५ टप्प्यांत मतदान होईल. राज्यात प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडीत कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे. अर्थात, वंचित बहुजन आघाडी, लहान पक्ष आणि अपक्षही नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये तिरंगी, बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.