अरुण गोखले
जीवाच्या गाठीस थोडेसे पुण्य लागते तेव्हा परमेश्वर जीवाला त्याच्या उद्धाराची एक संधी देत असतो. ती संधी म्हणजेच नरजन्म. माणसाचा जन्म देताना खरं म्हणजे देव त्याला त्याच्या सोबतच ज्ञानाचं, बुद्धीचं वरदानही देतो. तेव्हा त्या जन्मदात्याची हीच स्वाभाविक इच्छा असते की आता तरी या जीवाने प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक करुन घ्यावे. माझ्यापासून अलिप्त झालेला हा जीव परत मूळ शिवपदाशी येऊन मिळावा. जीवाशीवाची भेट व्हावी, आणि जीवाचे कल्याण व्हावे.
या जीवाच्या उद्धाराच्या हेतूनेच खरं तर त्या परमात्म्याने आपल्याला हे देहरुपी एक सुलभ सुंदर असे साधन दिलेले आहे. अवघ्या चराचरात भरुन उरलेला तो परमात्मा पाहण्यासाठी त्याने जीवाला दृष्टी दिली आहे. त्याची मंजूळ वाजणारी वाऱ्याची बासरी ऐकायला कान दिले आहेत. त्याच्या मंदिराच्या पायऱ्या चढण्यासाठी पाय दिले आहेत. त्या भगवंताला ओळखून त्याला वंदन करण्यासाठी, प्रेममिठी घालण्यासाठी हात दिले आहेत. त्याचे गुणगान करण्यासाठी, त्याचा नामघोष करण्यासाठी सुंदर वाचा दिली आहे.
हे सारं सारं त्यानं माणसाने त्याला ओळखावे आणि आपल्यामूळ स्थानाकडे परत धावत यावे ह्यासाठी दिले आहे. पण आम्ही जीव! आम्ही जीव मात्र जन्माबरोबर त्या सोहंची नाळ कापली गेली की आयुष्यभर कोहं कोहं म्हणून विचारीत फिरतो. जे काही इथे जमवतो, कमवितो, मिळवतो ते त्याच देणं आहे असं न मानता ही माझी कर्तबगारी आहे. माझं कर्तृत्व आहे, असे अभिमानाने मिरवतो. वृथा देहाभिमानाचे ओझे वाहात राहतो. आम्हीच आमचा अहं वाढवीत जातो. आमच्या सहज स्वभावाच्या विरुद्ध जातो आणि स्वत:च स्वत:च्या भोवती माया मोहाची लोभाची भ्रामक मोठेपणाच्या कल्पनांची जाळी विणून घेतो.
जन्मतो, वाढतो आणि एक दिवस मरतो पुन्हा जन्म घेण्यासाठी. पण सुदैवाने लाभलेल्या या नरजन्मात असे काही करावे की आपण नराचे नारायण होऊन जावे. असे मात्र अगदीच फार थोड्यांनाच वाटते. आम्हीच ही लाख मोलाची आत्मोद्धाराची संधी हातची दवडतो. जीवनाचा आनंद न घेता ते भोगात वाया घालवतो आणि संधी गमावून बसतो. कारण आम्हाला कोणी कितीही सांगितली तरी हे पटतच नाही की, हा जन्म नाही रे पुन्हा.