– शर्मिला जगताप
वेळ अशी की, दु:ख पांघरून पाखरे निःस्तब्ध व प्राण कंठावर अन् उरात पेटलेला वादळवारा! सर्व काही ठीक होईल, अशा आशावादात पाखरे. पण तो असतो मृगजळासारखा…
पाखरांचा एक सुंदर थवा दुपारी आकाशात घिरट्या घालत होता.
कुठल्याशा संकटाची त्यांना चाहूल लागली होती. काळ्या ढगांनी सूर्यावर पांघरुण घातले आणि सूर्य अचानक आभाळात गडप झाला. पाखरे पिलांसाठी खाऊ घेऊन आपापल्या घरट्याकडे परतली. पवन राजाने आणि वरुण राजाने आपली वक्रदृष्टी फिरवली! सोसाट्याचा वारा सुरू झाला. तशी पाखरे अस्वस्थ झाली. पाखरांची घरटी वाऱ्यासोबत हलायला लागली.
हा काय प्रकार सुरू झाला म्हणून इटुकली पिटुकली पिले पाखऱ्यांच्या पंख्यात लपू लागली. झाड गदागदा हालू लागले. घरटे असलेली फांदी वाऱ्याच्या दिशेने झुकू लागली. तितक्यात वरुण राजा पवन राजाच्या सोबतीला आला. पाऊस-वाऱ्याचा खेळ सुरू झाला. चिंब पावसाने भिजलेली पाखरे आपल्या पिलांना वादळवाऱ्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नात होती.
आभाळात एक वीज कडाडली. क्षणभर उजेड पडला आणि उरात धडकी भरवणारी विजेची किंकाळी कानावर पडली. पाखरांचा धीर खचू लागला तरी चिवचिव करीत इतरांना साथ देते होते.
इतका वेळ वाऱ्याशी झुंजणाऱ्या फांदीने झाडाची साथ सोडली. फांदीसोबत पक्ष्याचे घरटेही वाऱ्याबरोबर उडू लागले. पक्ष्यांनी आपल्या पिल्ल्यांना घट्ट पंखाखाली पकडून ठेवले. फांदी एका दुसऱ्या झाडावर अडकली. मात्र पक्ष्यांचे घरटे मोडले होते. पिलांना कसेतरी झाडाच्या ढोलीत ठेवून वारा-पाऊस शांत होण्याची वाट पाखरे पाहू लागली. मानवाचीही गडबड सुरू होती.
मानवाचेही घर मोडले होते. मानव झाडे तोडून पाखरांची घरटे उजाड करतो. पण आता माणसाच्याही घराची अशी अवस्था पाहून पाखरांना वाईट वाटले. तर वादळात विस्कटलेल्या घरात कुठेतरी एखादी पणती तग धरून कशीबशी फडफडत होती. त्या पणतीच्या उजेडात माणसाचा भयभीत चेहरा दिसत होता. माणसांचे बोलणे पाखरांच्या कानी पडत होते. कुठलेतरी “तौक्ते’ नावाचे चक्रीवादळ घोंघावते आहे.
पाखरे आपले अंग चोरून उघड्या डोळ्यांनी समोरचा रूद्र निसर्ग पाहात होती. रात्रभर हा खेळ सुरू होता. सकाळी सूर्यनारायणाने दर्शन दिले नाही. पण पवन राजा आणि वरुण राजा थोड्या वेळासाठी विश्रांतीला गेले असावे. पाखरांनी आपले पंख झटकले. चोच झाडाच्या खोडाला घासली. पिलांना पंखाखालून मोकळे केले.
पिले कधी आपल्या मोडलेल्या घरट्याकडे पाहत होती तर कधी आपल्या आई-वडिलांकडे. पाखरांनी सभोवार नजर फिरवली. मानव रडत होता. मदतीसाठी याचना करत होता. पण पाखरांच्या मदतीसाठी कोण येणार असे म्हणून पाखरांनी मोडलेले घरटे पुन्हा बांधायला घेतले. जगण्याची नवी उमेद घेऊन पाखरांनी उंच भरारी घेतली.
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा…’ या कुसुमाग्रजांच्या काव्याचा आधार घेऊन मानवाने कुणाच्या मदतीपेक्षा पाखरांसारखा स्वतःचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा करावा.