यांत्रिकीकरणाच्या युगात व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर संक्रांत
बेल्हे – एकेकाळी बैलांना पत्री मारणे व शिंगे साळणे हा व्यवसाय करणाऱ्यांना मोठया प्रमाणात मागणी होती. आजच्या आधुनिक युगात या व्यवसायाला उतरती कळा येऊ लागली आहे. बेल्हे (ता. जुन्नर) येथील प्रसिद्ध असणाऱ्या बैल बाजारात बैलांच्या पायांना पत्री मारण्याचा व्यवसाय एकेकाळी मोठ्या प्रमाणात होता. सध्या पत्री मारणे व शिंगे साळण्याचा व्यवसाय उतरतीकडे कलला आहे.
बेल्हे येथील बैल बाजार जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध असा बाजार आहे. शेळ्या, मेंढ्यांचा बाजार, तरकारी बाजार मोठा भरतो. या ठिकाणी शेतकरी व व्यापारी खरेदी- विक्रीसाठी येतात. यांत्रिकी युगात पारंपरिक व्यवसाय सांभाळणे व त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे जिकरीचे झाले आहे. पूर्वी शेती ही बैलाच्या सहाय्याने होत होती. मात्र, आता काळाच्या ओघात बैलाच्या सहाय्याने शेतीच्या मशागती कमी झाल्या आहेत.
बैलाच्या पायांना पत्र्या मारण्यासाठी बैलच येत नाही. बैलांचा बाजारही पहिल्यासारखा भरत नाही. एक ते दोन तासातच बाजार संपतो. त्यामुळे व्यवसाय करायला पुरेसा वेळ मिळत नाही. सध्या बाजारात बैलांच्या चार पायांना पत्र्या मारण्यासाठी 200 रुपये घेतले जातात तर शिंगे साळण्यासाठी 50 ते 100 रुपये घेतले जात आहेत.
शेतीच्या व्यवसायात यांत्रिकीकरण आल्यामुळे बैलांच्या माध्यमातून शेतीमध्ये मशागतीच्या कामाला मंदी आली आहे. गावोगावी बैल नसल्यामुळे ट्रॅक्टरच्या साहायाने शेती केली जाते. आमच्या बांगरवाडी गावात तीनशे ते साडेतीनशे शेतकरी आहेत. त्यांपैकी फक्त 4 शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. त्यामुळे बैलांच्या सहाय्याने शेती व्यवसाय दुर्मिळ झाला आहे.
– गजानन फराटे, प्रगतशील शेतकरी, बांगरवाडी.
बेल्हे बाजारात मी अनेक वर्षांपासून तसेच इतरत्र फिरून गेल्या अनेक वर्षांपासून बैलांच्या पायांना पत्री मारणे व शिंगे साळण्याचा व्यवसाय करीत आहे. यांत्रिकीकरणाच्या काळात शेतकरी वर्गाकडे बैल कमी होत चालले आहेत. त्यामुळे पत्र्या मारण्याच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. गावोगावी जाऊन प्रवास खर्च जास्त होतो. त्या पटीत पैसे मिळत नाहीत. प्रत्येक गावात बोटावर मोजण्याइतके बैल शिल्लक आहेत.
– आस्लम लालासाब सय्यद, व्यावसायिक, बेल्हे.
बैलांना सांभाळण्याचा खर्च सध्या परवडत नसल्याने शेतकरी बैलांऐवजी गायी व म्हशी पाळून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. बैलांच्या किमतीही खूप वाढल्या आहेत. बैलांचा पशुखाद्यही महाग झाल्याने बैलांपेक्षा गायी पालनाकडे शेतकरी वळत आहे.
– राजू पिंगट, दूध व्यावसायिक शेतकरी, बेल्हे.