नवी दिल्ली – जगभरातल्या देशांनी शाळा सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केले आहे. करोना काळामुळे गेल्या वर्षीच्या मार्चपासून जगभरातील शाळा बंद आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, अंतर्गत गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरु करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील करोनाची स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 17 ऑगस्ट पासून ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.