पणजी- कोणत्याही परिस्थितीत या किनारावर्ती राज्याला कोळशाची खाण बनवू देणार नाही. येथील पर्यावरण रक्षणाचे काम आम्ही करू, असे आश्वासन कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी शनिवारी गोव्यात दिले. राज्यात आल्यानंतर त्यांनी कोळी बांधवांची भेट घेतली.
त्यावेळी ते बोलत होते. मला सर्वाधिक काळजी गोव्यातील पर्यावरणाची वाटते. कोणत्याही परिस्थितीत ते वाचवलेच पाहिजे. सार्वंसाठीच आम्ही पर्यावरणाला वाचवू, असे राहूल यांनी स्पष्ट केले.
कोळशाच्या खाणीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून गांधी म्हणाले, कोळशांच्या खाणींमुळे गोव्याचा कोणताही लाभ झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याची कोळशाची खाण बनवू देणार नाही. येथे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. तो थांबवण्याची गरज आहे.
राहुल गांधी यांनी दिवसभरात कोळशाच्या खाणींमुळे पिडीत जनतेच्य गाठीभेटी घेतल्या. तळईगाव येथे एसपी मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे झालेलल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही त्यांनी उपस्थिती लावली. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत एकजुटीने भाजपाचा मुकाबला करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, आम्ही छत्तिसगढमध्ये निवडणूक लढलो. तेथे आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले. ते आम्ही पूर्ण केले. तुम्ही कर्नाटक आणि पंजाबमध्ये जाऊनही याची खातरजमा करून घेऊ शकता. आमच्या जाहीरनामा म्हणजे वचन असते. ती फसवी आश्वासने नसतात.