चांगले नागरिक होऊन समाज, देशासाठी योगदान द्या : रितेश कुमार
पुणे – “विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी आपापसात न भांडता, कोणी चुकीचे वागत असेल तर पोलीस व विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांकडे जावे. एक चांगले नागरिक होऊन देशासाठी, समाजासाठी चांगले योगदान द्या,’ अशा शब्दांत पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे विद्यापीठाचे वातावरण तापले होते. पोलिसांकडून काही दिवस जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व पोलीस प्रशासनातर्फे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांबरोबर समन्वय साधण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, माजी पोलीस सहसंचालक जयंत उमराणीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. देविदास वायदंडे, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले आदी उपस्थित होते. संघटनांचे दीडशेहून अधिक प्रतिनिधीही उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी मागील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सहभागी होताना विद्यापीठाची प्रतिमा कशी उंचावेल यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी हा शैक्षणिक संकुलाचा कणा आहे आणि त्यांच्या सोबतच्या समन्वयानेच विद्यापीठाची भविष्यात प्रगती होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, विद्यापीठातल्या विविध प्रश्नांबाबत विविध संघटनांमार्फत होणारी आंदोलने, सभा, कार्यक्रम आदींसाठी सर्वसंमतीने कार्यप्रणाली विकसित करण्याचे ठरविण्यात आले.
पोलीस आयुक्त म्हणाले…
* विद्यार्थ्यांनी काळजी घेऊनच लोकशाही मार्ग अवलंबावा
* शिक्षण, संघटन महत्वाचे असले, तरी कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
* कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणीही करू नये
* इच्छा नसतानाही काहीवेळा अपरिहार्य कारणामुळे गुन्हे दाखल करण्याची वेळ येते. त्यामुळे सामंजस्याने वागणे महत्त्वाचे.