मुंबई – महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे. एस. टी कर्मचाऱ्यांचा संप, म्हाडा, टीईटी, आरोग्य पेपरफुटी, करोना मृतांचा आकडा, करोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात होत असलेली दिरंगाई आदी मुद्द्यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरसावला असून ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न सत्ताधारी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पेट्रोलच्या वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील व्हॅट कर कमी करण्याची मागणी करून विरोधी पक्ष सरकारला पेचात पकडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी जीएसटीच्या परताव्याची मोठी रक्कम केंद्र सरकारकडून मिळालेली नाही. ती मिळाल्यास व्हॅट कमी करता येईल, अशी भूमिका सत्ताधारी मांडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.
केंद्रीय यंत्रणांचा राज्यातील वाढत्या हस्तक्षेपाचा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. राज्याच्या पोलीस खात्याकडून तपास सुरू असताना अनेक प्रकरणात केंद्रीय यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. या राज्यातील पोलिसांवर केंद्राचा विश्वास नाही का? अशी भूमिका मांडण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या तोफा सरकारची खिंड लढवतील. तर देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम आणि प्रवीण दरेकर आदी मंडळी विरोधकांच्या वतीने हल्ले चढवतील.
टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून गोंधळाची शक्यता
टीईटी परीक्षा घोटाळ्यावरून विधिमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. या सर्व घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रीतिश देशमुख याच्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट भाजपा सरकारच्या काळात मिळाले होते. त्यामुळे या घोटाळ्याच्या सखोल चौकशीची अथवा न्यायालयीन चौकशीचे आदेश सरकार देऊ शकते, त्यामुळे या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.