मुंबई – राज्यसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेनेने आता विधान परिषद निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत जोरदार कंबर कसली आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. दुसरीकडे पाचवा उमेदवार कसा निवडून आणावा याची रणनिती आखण्यासाठी भाजपच्याही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होत आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजाराला पुन्हा सुरु होईल. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच 18 जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रेनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार 20 जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत.
दुसरीकडे, भाजपनेही रणनितीसाठी बुधवारपासून बैठकांना सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. आशिष शेलार यांच्यासह उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
कॉंग्रेसकडूनही भेटीगाठी
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. राज्यसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीनेही परिषदेची निवडणूक अधिक गांभीर्याने घेतली आहे. अपक्षांमध्ये जास्त मते ही बहुजन विकास आघाडीकडे असल्याने हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला मतदान करावे म्हणून भाई जागताप यांनी भेट घेतली.