- नागरिकांमध्ये संभ्रम
- 2017 साली अर्ज केलेल्यांना सोडतीमधून डावलले
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वस्त घऱे उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठीची सोडत शनिवारी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ऑनलाइन पद्धतीने झाली. या सोडतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून घोटाळा झाला असल्याचा आरोप होऊ लागले आहेत. सोडतीमध्ये केवळ नवीन अर्ज दाखल केलेल्यांचा समावेश केला असून जुन्या अर्जदारांना डावलण्यात आला असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
प्रधानंमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 707 अर्ज पात्र ठरले. प्रकल्पाच्या अंतर्गत चऱ्होली 1442, रावेत 934 व बोऱ्हाडेवाडी 1288 अशा एकूण 3664 सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. मात्र या सोडतीमध्ये घोटाळा झाला असून जुन्या अर्जदारांना डावलण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी महापालिकेच्या चिंचवड येथील झोपडपट्टी पुनवर्सन विभागामध्ये गर्दी केली होती. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 2017 मध्ये नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्येही यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात आले. तर यापूर्वी ज़्यांनी अर्ज सादर केला होता त्यांनी फक्त ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रिंट व 5 हजार रुपयांचा डीडी भरायचा होता.
शनिवारी झालेल्या सोडतीमध्ये केवळ नवीन अर्जदारांचाच समावेश आहे. तर 2017 साली ज्यांनी अर्ज केले होते. त्या एकाही नागरिकाचा सोडतीमध्ये नंबर लागला नाही. पालिका प्रशासनाने जुन्या अर्जदारांना डावलून नवीन अर्जदारांचा फक्त या सोडतीमध्ये समावेश केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सलग तीन दिवस संकेतस्थळ हॅंग
करोनामुळे सोडतीच्या ठिकाणी गर्दी करु नका. महापालिकेच्या संकेतस्थळावर सोडत पहायला मिळेल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु सोडतीच्या दिवशीपासूनच सलग तीन दिवस महापालिकेचे संकेतस्थळ हॅंग झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आपला नंबर लागला आहे का किंवा वेटिंग लिस्टमध्ये कोण-कोण आहे हे पाहणे शक्य होत नाही. सोडत झाल्यापासून संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांनी पालिका प्रशासनावर घोटाळ्याचा आरोप केला आहे.
पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली आहे. 2017 सालच्या लाभार्थ्यांबाबत खातरजमा करण्यात येईल. त्यावर पुढील निर्णय घेऊ. मात्र सगळ्यांचा या सोडतीमध्ये समावेश केला आहे. ज्या नागरिकांचा नंबर लागला आहे त्यांनी पुढे काय करायचे व ज्यांचा नंबर लागला नाही. त्यांना आमचा नंबर का लागला नाही हे विचारण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र त्यांच्या शंकाचे निरसन केल्यावर ते तात्काळ तेथून गेले.
– आण्णा बोदडे, उपायुक्त