प्रशासनाकडे मागणी ः खासगी कर्मचाऱ्यांना अप-डाऊनसाठी अनेक “प्रॉब्लेम्स’
पुणे – मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराला जोडणाऱ्या इंटरसिटी, लोकल आणि डेमू सुरू करण्याची मागणी पुन्हा प्रवाशांकडून होत आहे.
पुण्यात बऱ्याच प्रमाणात खासगी आणि शासकीय कार्यालयांसह विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध असल्याने घर ते कामाचे ठिकाण असा प्रवास करणे आव्हानात्मक आहे. शहरात आणि लगतच्या गावांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे ठरते. तर, नोकरीवर हजर न झाल्यास नोकरी जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी, लोणावळा-पुणे, पुणे-दौंड, पुणे-सातारा आदी मार्गांवर डेमू सोडण्यात याव्या, अशी मागणी होत आहे.
रेल्वे फेऱ्या सुरू होण्याबाबत निर्णय नाही
नोकरीनिमित्त रेल्वेतून पुणे शहरातून अन्य शहरांत आणि आजुबाजूच्या गावांतून शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. अनेकांना आता रोज नोकरीच्या ठिकाणी हजर राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रवास करताना अडचणी येत आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईसाठी गाड्या सुरू केल्या आहेत. तर पुण्यासाठी का नाही? असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला आहे. मात्र, रेल्वे फेऱ्या सुरू होण्याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.
प्रवाशांच्या मुख्य अडचणी
* खासगी वाहन नाही
* अधिक आर्थिक खर्च
* अधिक वेळ लागतो
* रस्त्याने प्रवास करणे सोयीचे नाही
* दुचाकीने अधिक प्रवास करणे अवघड