नवी दिल्ली – जीएसटीची मोठी थकबाकी केंद्राकडून राज्यांना दिली जाणे बाकी आहे. गेल्या आर्थिक वर्षातील ही थकबाकी 81 हजार कोटींवर गेली आहे.
सरकारकडूनच आज संसदेत ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. जीएसटी कलेक्शन कमी झाल्याने ही थकबाकी वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या आर्थिक वर्षात सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 91 हजार कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी दिली गेली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मंत्र्यांनी सांगितले की, करोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याने जीएसटी कलेक्शनमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे राज्यांना द्याव्या लागणाऱ्या नुकसानभरपाईच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
कोणत्या राज्याला किती देणे बाकी आहे याची यादीही मंत्र्यांनी आज या उत्तरात दिली. यात सर्वाधिक थकबाकी महाराष्ट्राची असून महाराष्ट्राला केंद्राकडून 15 हजार 138 कोटी रुपये देणे बाकी आहे असेही मंत्र्यांनी या उत्तरात सांगितले.