नवी दिल्ली – केंद्र सरकार इस्रायलच्या पेगसस स्पायवेअरची यंत्रणा वापरून देशातील तीनशे जणांच्या फोन संभाषणावर पाळत ठेऊन असल्याचा गौप्यस्फोट एका आंतरराष्ट्रीय अहवालात करण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज संसद अधिवेशनात चांगलेच पडसाद उमटले.
या प्रकारावरून सरकारकडून खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आल्यानंतर नवे माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांनी या प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचे सांगून हे प्रकरण फेटाळून लावले.
ते म्हणाले की, संसद अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशीच हा अहवाल प्रकाशित होतो हा केवळ योगायोग असू शकत नाही. सरकारने हेरगिरीसाठी अशा कोणत्याही यंत्रणेचा वापर केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच या आरोपांना कोणताही आधार नाही असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधकांकडून हे प्रकरण संसदेत मोठ्या प्रमाणात लावून धरले जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पण सरकार अत्यंत निडरपणे या प्रकरणाचा सामना करेल, अशी माहितीही सत्तारूढ पक्षाकडून देण्यात आली.