नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाशी संबंधित कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक बाबींबद्दल यापुढे आता फक्त तेजस्वी यादवच ( Tejashwi Yadav) बोलतील असे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज दिल्लीत पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत जाहीर केले. याचा अर्थ राजदची धुरा आता आपण तेजस्वी यांच्याकडे सोपवली असून तेच आता पक्षाचे सर्वेसर्वा असतील असे सूचित करत त्यांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
एकीमध्येच बळ असल्यामुळे पक्षातील सर्व सहकाऱ्यांनी संघटीत राहावे असे आवाहन करून ते म्हणाले की इकडे तिकडे डोकावण्याचे प्रकार करू नयेत तसेच काही बोलायचे असेल तर काळजीपूर्वक बोलले पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचार केला आहे की यापुढे कोणत्याही धोरणात्मक विषयावर तेजस्वी यादवच आता माध्यमांशी बोलतील.
राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत सुरू असून त्यात तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav ) यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष घोषित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. बिहारचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी तसा प्रस्ताव दिला होता. मात्र स्वत: जगदानंद यांनीच बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे तेजस्वी ( Tejashwi Yadav ) यांच्या संदर्भातील प्रस्तावाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जगदानंद यांच्या अनुपस्थितीचे कोणते खास कारण नाही व त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
बिहारच्या नितीश सरकारमध्ये मंत्री असलेले लालू यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव आजच पक्षाच्या बैठकीतून निघून गेले. ते कशामुळे नाराज आहेत याची चर्चा झाल्यावर ते पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शाम रजक यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात आले. रजक यांनी शिवी दिली आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप तेजप्रताप यांनी केला आहे.
बैठकीत तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav ) म्हणाले की, देशभरातील विविध राज्यांमधील सरकारे पाडण्याचे काम करत फिरणारी भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये स्वत:च पडली. बिहारमध्ये गेल्या महिन्यात जे झाले त्यामुळे देशात काय वातावरण आहे ते आता सगळ्यांनाच माहिती आहे.बिहारने जे करून दाखवले ते आता देशातही होऊ शकते असा आशेचा किरण आता विरोधी पक्षांना दिसतो आहे.