वाई (प्रतिनिधी) – करोनामुळे एसटी महामंडळाचा कारभार पूर्णत: कोलमडला आहे. महामंडळात काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या कामगारांसह संपूर्ण व्यवस्था बंद पडण्याची भीती निर्माण झाली असताना महामंडळाने माल वाहतुकीचे पाऊल उचलून लालपरी तारण्यासाठी धाडसी निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या तसेच जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर अतिशय सुरक्षित माल वाहतूक करणाऱ्या महमंडळाच्या उपक्रमाचा वाई आगारातून माल वहातुकीचा शुभारंभ झाला आहे.
आगारव्यवस्थापक गणेश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मालवहातुकीचा जो विढा उचलला आहे, तो पूर्ण करण्याकरीता अविरतपणे प्रयत्न करण्यासाठी महामंडळाचे कर्मचारी सज्ज झाले आहेत.
वाई बाजार समितीतून दोन ट्रक भरून महामंडळाच्या या अनोख्या योजनेचा शुभारंभ केला असून त्यांच्या या कार्याला वाई शहरातील सर्व शेतकरी व कारखानदार, व्यापारी, नागरिकांकडून शुभेच्छा व सहकार्य लाभत आहे. महामंडळाने सुरु केलेल्या मालवाहतुकीच्या उपक्रमामुळे ओझर्डे येथील शिवतेज उद्योग केंद्राचा हळदीचा माल मुंबई येथे अतिशय अल्प दरात सुखरूप पोहोचण्यास यश आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात विश्वासाहर्ता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांत हजारो टन मालाची वाहतूक महामंडळाने केली आहे. त्यामुळे लॉकडाऊन चालू असल्याने प्रवशांनी जरी पाठ फिरवली असली तरीही, माल वाहतूक करून महामंडळाने गरुड भरारी घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शुभारंभ प्रसंगी सातारा विभागाचे प्रमुख पळसुले, डिटीएस विजयराव मोरे आवर्जून उपस्थित राहून सर्व सहकाऱ्यांची वाहवाह करीत मोलाचे मार्गदर्शन केले.