पंढरपूर – माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. या कालावधीत वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचे मिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.
आपल्याकडे दरवर्षी मोठ्या उत्सवात हा सण साजरा केला जातो. या दिवशी भक्त विशेषतः विद्या आणि बुद्धतीची देवी सरस्वतीची पूजा आणि प्रार्थना करतात. आणि याच शुभ मुहूर्तावर होणाऱ्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेलं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजवले आहे.
यावेळी 36 प्रकारच्या सात टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आले आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. अशी माहिती मंदिर समिती आणि कार्यकर्ते यांनी दिली आहे. सध्या मंदिरात फुलांचा दरवळ आणि भक्तीचा नाद दिसून येत आहे.