वाड्या-वस्त्यांवर किराणामाल विकेत्यांचा माल संपला
शिंदे वासुली- खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील गाव, वाड्या-वस्त्यांवरील किराणा मालाच्या दुकानातील जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. दैनंदिन गरजेचा किराणामाल विकणाऱ्या बहुतांशी छोट्या दुकानदारांकडे शॉप ऍक्ट लायसन्स नसल्यामुळे त्यांना किराणा मालाची होलसेल खरेदी करताना अडचणी येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले व खेडचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे केली आहे.
देशभरात 14 एप्रिल पर्यंत करोना आपत्कालीन परिस्थितीमुळे कर्फ्यू लावला गेला आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जीवनावश्यक किराणा व भाजीपाला दुकाने काही अटींचे पालन करण्यावर खुली ठेवलेली आहेत; परंतु लॉकडाऊन होऊन 15 दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळे दुकानात असलेला किराणा व जीवनावश्यक वस्तुंचा सगळा साठा संपला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या दुकानदारांना आपल्या दुकानात नागरीकांना विक्रीसाठी माल उपलब्ध ठेवण्यासाठी, मालाची खरेदी व वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळायला हवी. त्यासाठी ग्रामपंचायतीचा त्यांचा व्यवसाय सुरु असल्याचा दाखला ग्राह्य धरून त्यांना पास द्यायला हवेत. असे मत मांडून बुट्टे पाटलांनी संबंधित प्रशासकिय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
- किराणामाल दुकानदाराचे म्हणणे
माझ्याकडे शॉप ऍक्ट परवाना असूनही पुणे मार्केटमध्ये किराणा व अन्य जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने खरेदी कराव्या लागतात. असणाऱ्या किंमतीपेक्षा वाढीव दराने माल घेतल्याने दुकानावर विक्री करताना आम्हाला आणखी किंमत वाढवावी लागते. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने योग्य किमतीत माल उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना रास्तभावात विक्री करता येईल, असे वासुली फाटा येथील एका किराणा दुकानदाराने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. - जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा यादीतील व्यावसायीकांना कोणत्याही पासेसची गरज नाही. वाजवी किंमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करणाऱ्या व साठेबाजांवर शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
– संजय तेली, उपविभागिय अधिकारी, खेड