पिंपरी – कामगारांचे समर्पण, त्याग आणि कठोर परिश्रमाने महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील राज्य झाले आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी करण्यात आणि देशातील सर्वात प्रगतीशील आणि आकर्षक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिमा निर्माण करण्यात कष्टकरी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने 35 व्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार, रावबहादूर मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते.
कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार ऍड. मनीषा कायंदे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार सदा सरवणकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे, जिल्हाधिकारी राजेन्द्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार भारतीय मजदूर संघाला प्रदान करण्यात आला, तर कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लिमिटेडचे मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. त्यांना 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील 51 गुणवंत कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.