पुणे – कोकण महामार्ग दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कामाचा पाठपुरावा करण्यासाठी कोकणवासियांनी अभियान सुरू केले आहे. “कोकणभूमी प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने हे अभियान सुरू केले आहे.
प्रतिष्ठानने “कोकण हायवे समन्वय समिती’ची ऑनलाइन बैठक घेतली. हायवेची तीन टप्प्यात विभागणी करून प्रत्येक विभागाचे कामकाज पाहण्यासाठी अभ्यासगट तयार करण्याचा निर्णय घेतला. येत्या दोन महिन्यांत संपूर्ण हायवेचा सद्य:स्थिती अहवाल बनवण्यात येणार आहे.
पुढील दोन महिन्यांत हा हायवे निर्माण व्हावा यासाठी पक्षविरहीत चळवळ उभारण्याचे काम ही समिती करणार आहे. निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेऊन ठेकेदारांना सूचना करून तसेच खराब कामाचे छायाचित्र काढून त्याची संबंधितांना माहिती कळवणे या गोष्टी करण्याबाबतही चर्चा केली.
हायवेवर चुकीच्या ठिकाणी असलेले एक्झीट, रस्त्यालगतचे साइन बोर्ड चुकीचे आहेत, आरवली पट्ट्यादरम्यानचे काम बंद आहे. तेथील ठेकेदार बदलला नाही. कोकण हायवेवर असलेल्या 22 पुलांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, ते एकाच ठेकेदाराला दिले गेले. हायवेलगत वृक्षारोपण करण्याची कामे येथील स्थानिकांना द्यावी त्यातून रोजगार निर्माण होईल, असे समितीतील काहींचे म्हणणे आहे.
कोकण हायवे संदर्भातील कामांवर लक्ष देण्यासाठी अभ्यास आणि दबाव गट असे दोन गट तयार करणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यास गट सर्व कामाचा अहवाल तयार करेल आणि त्या अहवालाप्रमाणे दबावगट त्याचा पाठपुरावा करेल, यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती “प्रतिष्ठान’ चे संस्थापक संजय यादवराव यांनी पत्रकाद्वारे दिली.