सातारा/भुईंज – तब्बल 25 महिने पगारापासून वंचित असलेल्या भुईंज, ता. वाई येथील किसनवीर सातारा साखर कारखान्याच्या कामगारांनी अखेर व्यवस्थापनाविरोधात सोमवारी कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले. व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना आणि आम्ही अडचणीत आल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, कामागारांचे थकित असलेले सर्व पगार त्वरीत द्यावेत, थकित पी. एफ., ग्रॅज्युएटी व एल.आय.सी. त्वरीत भरावे, एप्रिल 2014 पासून लागू झालेली 15 टक्के पगारवाढ व फरक रक्कम त्वरीत द्यावी, थकित सर्व बोनस त्वरीत द्यावे, हंगामी सेवकांचे थकित रिटेंशन व रजेचा पगार मिळावा, कामगारांना
एप्रिल 2019 पासून लागु झालेली 12 टक्के पगारवाढ व फरक रक्कम द्यावा, व्यवस्थापनाने ठरवलेल्या पॅटर्ननुसार टेम्पररी असलेल्या कर्मचाऱ्यांना हंगामी करण्यात यावे, राहिलेल्या 83 लोकांचे ग्रेडेशन करावे, कामगारांच्या पगारातून कपात झालेली दोन्ही सोसायटींची रक्कम दोन्हीही सोसायटींना त्वटीत जमा व्हावी आदी मागण्या यावेळी आंदोलक कामगारांनी केल्या. राज्यभरात नावाजलेला किसनवीर सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांमध्ये अडचणीत आला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचीही ऊसबिले मोठ्या प्रमाणात थकवली असून, खोटी आश्वासने देत कामगारांनाही तब्बल 25 महिने पगारापासून वंचित ठेवले आहे.
आज पगार होईल, उद्या होईल, पुढच्या महिन्यात होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी तब्बल 25 महिने कारखान्यात घाम गाळला. विशेष म्हणजे यंदाचा हंगाम व्यवस्थापनाला सुरू करता आला नाही. व्यवस्थापनाकडून नको त्या बाबींवर मोठ्या प्रमाणात झालेला खर्च, नियोजनशून्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला आहे. व्यवस्थापनाने वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन फसवणूक केल्याचा आरोप कामगारांनी केला.
व्यवस्थापनाने गैरफायदा घेतला
किसनवीर कारखाना शेतकऱ्यांच्या घामातून उभा आहे. त्यासाठी अनेक शेतकरी भूमिहीन झाले. कारखान्यातील बहुतांश कर्मचारी भूमिपुत्र आहेत. कर्मचाऱ्यांच्या कारखान्यावरील प्रेमाचा व्यवस्थापनाने गैरफायदा घेतल्याची प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली.