कोल्हापूर – कोल्हापुरात २५ लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी दोघा सावकारांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली. मुख्य संशयित सावकार, सराईत गुन्हेगार सूरज हणमंतराव साखरे आणि त्याचा साथीदार ऋषभ सुनील भालकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर रणजित बाबूराव पाटील असे अपहृत तरुणाचे नाव आहे. अपहरण करुन त्याला डांबून मारहाण केल्याचा प्रकार घडला. पाटीलने महिन्याला वीस टक्के व्याजाने सावकाराकडून १० लाख रुपये कर्जाने घेतले होते. त्यापोटीच्या व्याजवसुलीसाठी त्याच्याकडून २५ लाखांची मागणी केली होती. त्याच्याकडून दहशतीने १२ गुंठे जमिनीचे वटमुख्यत्यारपत्र करुन घेतले. ६ ते ८ मे रोजी हा प्रकार घडला.
या तरुणाने ७ मे रोजी रात्री अकराच्या सुमारास सावकारांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि त्याने घडलेला प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सांगितला. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणने संयुक्त कारवाई करुन संशयितांना अटक केली. या प्रकरणातील संशयित अभि उर्फ युवराज मोहन महाडिक, युनूस हसन मुजावर, चालक पुष्कर आणि पार्थ (पूर्ण नाव नाही) यांच्यासह सहाजणांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.